औरंगाबाद - निवडणूक विभागातर्फे शिक्षकांना 18 ते 22 मार्चला लोकसभा निवडणुकीचे प्रशिक्षण दिले जात आहे; मात्र याच दिवशी दहावी आणि बारावीची परीक्षा आहे. त्यामुळे शिक्षकांसमोर पेच निर्माण झाला असून, एका दिवसात यापैकी कोणतीही एकच जबाबदारी पार पाडता येणार असल्याने काय करावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात 18 एप्रिलला मतदान आहे. निवडणुकीच्या कामासाठी या वेळी सर्वच शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. दहावीची परीक्षा 19, 20 व 22 मार्चला; तर बारावीची 19 व 20 मार्चला संपणार आहे. या तीनही दिवशी शिक्षकांना औरंगाबाद शहरातील सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात निवडणूक प्रशिक्षण दिले जाणार आहे.
प्रशिक्षणाची वेळ दुपारी दोन आहे; तर दहावी, बारावीचे पेपर सकाळी अकरा ते दुपारी दोन आणि तीन ते पाच या वेळेत होणार आहेत. त्यामुळे शिक्षकांपुढे पेच निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रत्येक शाळेतील 90 टक्के कर्मचाऱ्यांची नियुक्ती निवडणुकीसाठी केली आहे. यामध्ये शाळेतील सेवकांचाही समावेश आहे.
पत्र दिले; पण उत्तर मिळाले नाही
अनेक शाळा, संस्थांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र पाठवून प्रशिक्षणातून पर्यवेक्षक, केंद्रप्रमुखांना सूट देण्याची विनंती केली आहे; परंतु प्रशिक्षण सुरू झाले तरीही जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून याबाबत कुठलेही उत्तर आलेले नाही. निवडणूक प्रशिक्षणाला हजेरी लावली नाही तर कारवाई होईल, या भीतीने शिक्षकांमध्ये शिक्षकांनी मौन बाळगले आहे.
|