दिवसभर रणरणते ऊन, सायंकाळनंतर असह्य उकाडा
औरंगाबाद - तप्त उन्हाच्या झळांमुळे मराठवाड्याची काहिली होत असून, उकाड्यानेही त्रस्त करून सोडले आहे. बहुतांश शहरांच्या कमाल तापमाचा पारा 40 अंशांदरम्यान आहे.
मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, औरंगाबाद जिल्ह्यांतील काही भागांत काही दिवसांपूर्वी वादळी वारे, विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पाऊस झाला. अनेक ठिकाणी गारपीटही झाली. या पावसामुळे काही पिकांचे नुकसान केले, तर चारा भिजविला. वातावरणात तेवढ्यापुरता गारवा निर्माण झाल्यानंतर दोन-तीन दिवसांपासून तापमान पुन्हा वाढू लागले आहे. सकाळी दहापासूनच ऊन तप्त होत असून भरदुपारी बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. रणरणत्या उन्हात दिवसभर तापणारी शहरे रात्री असह्य उकाड्याने त्रस्त होत आहेत. शहरनिहाय शुक्रवारी (ता. पाच) नोंदले गेलेले कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये असे ः परभणी- 42.0, औरंगाबाद 41.4, हिंगोली 41.0, नांदेड 40.0, बीड 40.0, लातूर-उस्मानाबाद 39.0.
|