पत्ताकोबीवर ५० हजार खर्च,  उत्पन्न शून्य, शेतकरी संकटात 

शेतात पडून असलेली पत्ताकोबी
शेतात पडून असलेली पत्ताकोबी

परळी वैजनाथ (जि. बीड) - देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून, २१ दिवस संपूर्ण व्यवहार बंद पाळण्याची घोषणा केली आहे. या काळात जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी तीन तासांचा वेळ देण्यात आला; मात्र बंदमुळे भाजीपाल्यासह व फळांचे मोठे नुकसान होत आहे. 

गाढेपिंपळगाव येथील शेतकरी लक्ष्मण उत्तमराव राडकर यांनी आपल्या शेतात पत्ताकोबीचे पीक एक एकरवर लावले. यासाठी जिवापाड मेहनत घेतली. रात्रंदिवस जागून पिकाची जोपासना केली. पत्ताकोबीही जोमात आली. जवळपास एक गड्डा तीन ते चार किलोएवढा भरू शकतो. शेतमाल तयार झाला; पण श्री. राडकर यांच्यामागे शुक्लकाष्ठ लागले. चीनमधून आलेल्या या विषाणूने संपूर्ण जगासह आपल्याही देशात धुमाकूळ घातला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसांचा बंद पुकारला. या बंदमध्ये राज्यासह जिल्हाबंदी करण्यात आली. त्याचबरोबर संपूर्ण बाजारपेठेसह वाहतूक बंद करण्यात आल्याने हा माल तोडून विक्री कुठे आणि कसा करायचा? हा प्रश्न निर्माण झाला आहे. कोबीची लागवड व त्याची जोपासना करण्यासाठी ५० हजार रुपयांचा खर्च झाला आहे.

आता या पिकातून १० रुपये किलोप्रमाणे अंदाजे २० क्विंटल कोबी एक एकरमध्ये निघाली असती; पण कोबी पडून असल्याने दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. साधा लागवडीचाही खर्च निघणेही दुरापास्त झाले आहे. कोबी काढण्यासाठी मजूर लावून खर्च केला तर त्याची विक्री कुठे करायची? हा प्रश्न आहे. कारण संपूर्ण बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून किमान लागवडीची तरी नुकसान भरपाई देण्याची मागणी श्री. राडकर यांनी केली आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com