जालना, नांदेड - जालना जिल्ह्यात दोन आणि नांदेडमध्ये एक अशा तीन शेतकऱ्यांनी कर्ज आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली.
श्रीपत धामणगाव (ता. घनसावंगी) येथील तात्या राधाकिसन शिंदे (वय 45) यांनी आत्महत्या केली. पिंपळी धामणगाव (ता. परतूर) शिवारातील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. शिंदे यांच्या नावे तीन एकर जमीन होती. मात्र, मुलींचे लग्न आणि घरखर्चासाठी त्यांना बरीच जमीन विकावी लागली. चार दिवसांपासून ते बेपत्ता होते. दुसऱ्या घटनेत पांगरा तांडा (ता. घनसावंगी) येथे सुरेश शंकर राठोड (वय 40) यांनी शेतात विष घेऊन आत्महत्या केली. तिसरी घटना नांदेड जिल्ह्यातील आहे. जांब (ता. मुखेड) येथे विलास सदाशिव गायकवाड (वय 39) यांनी शनिवारी (ता. एक) विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. दरम्यान, शनिवारीही जालना, औरंगाबाद, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या.
|