लातूर : अतिवृष्टी आणि त्यानंतर वातावरणात झालेल्या बदलामुळे लातूर जिल्ह्यात तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासंदर्भात शेतकऱ्याकडून आलेल्या तक्रारीची दखल घेऊन पालकमंत्री अमित देशमुख यांनी केलेल्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने एकूण पीक परिस्थितीचा आढावा घेऊन तूर उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने संभाव्य नुकसानीच्या २५ टक्के रक्कम तातडीने अदा करावी, अशी अधिसूचना काढली आहे.
जिल्ह्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती आणि खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेतात पुराचे पाणी घुसून नुकसान झाले तर काही ठिकाणी जास्त काळ पाणी साचून राहिल्याने नुकसान झाले. तुरीच्या पिकाला जास्तीचे पाणी सहन न झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी हे पीक वाया गेले. अतिवृष्टीनंतर हवामानात झालेल्या बदलामुळेही उभ्या तुरीच्या पिकाचे खराटे झाले आहेत.
या संदर्भातील माहिती आणि तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला या संदर्भाने पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार जिल्हा प्रशासन तसेच कृषी विभागाने आढावा घेऊन हंगामामध्ये प्रतिकूल परिस्थितीमुळे तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अहवाल तयार केला आहे.
यावर्षी तूर पिकाचे वार्षिक सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी उत्पादन होणार असल्याचे त्यात नमूद केले आहे. सरासरी ५० टक्क्यांपेक्षा कमी उत्पादन होणार असल्यामुळे संभाव्य नुकसानभरपाई रकमेच्या २५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना तातडीने अदा करावी अशी अधिसूचना लातूर जिल्हाधिकारी यांनी भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड मुंबई यांना केली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून अंतिम कापणी अहवाल आल्यानंतर त्वरित विम्याची रक्कम ही त्यांना मिळणार आहे.
Edited - Ganesh Pitekar
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.