ठेकेदाराचा दोष नागरिकांच्या मूळावर! शहराच्या बाह्य वळण रस्त्याचे कॉर्नर ठरतायेत अपघाताचे केंद्र

umarga
umarga

उमरगा (उस्मानाबाद) : शहराच्या वळणरस्त्याच्या दोन कॉर्नरला आणि या मार्गावर ग्रामीण भागात जाणाऱ्या रस्त्याच्या क्रॉसिंगला सूरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना नाहीत. यामुळे मागील 8 महिन्यांत जवळपास 20 अपघात झाल अनेकांना मृत्यूच्या दाढेत जावे लागले. तर अनेकांच्या नशिबी कायमचे अपंगत्व आले.

दरम्यान भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या चौपदरीकरण्याच्या कामातील अनेक दोष वाहनधारक व प्रवाशांच्या मूळावर उठले आहेत. महामार्ग प्राधिकरण व कामाच्या ठेकेदाराने केलेल्या अनेक चूकावर पांघरून घालण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न राज्यकर्त्याकडून केला जात असल्याची चर्चा होत आहे.

सोलापूर ते कर्नाटक सिमेपर्यत चौपदरीकरणाच्या डांबरीकरण झालेले असले तरी महामार्गावर अनेक ठिकाणी अडथळे कायम आहेत. काही ठिकाणी नव्याने झालेले काम उखडल्याचा प्रकार दिसून येत आहे. आष्टामोडवरील पुलाचे काम अर्धवट स्थितीत लटकले आहे.

मुरूम मोडवरील उड्डाण पुलाचे काम रखडले आहे. येणेगुर, दाळींब, येळी गावातही सूरक्षिततेसाठी उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. धोकादायक ठिकाण असलेल्या बलसुर मोड येथे भूयारी मार्ग अथवा उड्डाणपुलाची मागणी करूनही भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडुन दखल घेतली गेली नाही. ऐन महामार्गालगत असलेल्या जकेकुर गावातही सुरक्षित मार्ग नसल्याने अपघात होताहेत.

जकेकूर - चौरस्ता येथील उड्डाण पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. मुळजमोड वरील उड्डाणपुलाचे काम अजुनही पूर्ण झालेले नाही. दाबका ग्रामस्थांनी भूयारी मार्ग अथवा उड्डाणपुल करण्याच्या मागणीसाठी रस्त्याचे काम अडवले होते मात्र सुरक्षितेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना न करता दडपशाहीने डांबरीकरणाचे काम आटोपण्यात आले.

मुळजमोडवरील उड्डाणपुलाचे काम अजुनही पूर्ण झालेले नाही. दरम्यान ठिकठिकाणी पडलेल्या खड्यामुळे अपघात वाढले असताना नागरिकांच्या जीवन मरणांच्या प्रश्नाकडे डोळेझाक करणाऱ्या संबंधित कंपनी व प्रशासनाबद्दल वाहनधारक, नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. आत्तापर्यंत दोनशेपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला असुन अनेकांच्या नशीबी अंपगत्व आले आहे.

वळण रस्ता ठरतोय अपघात मार्ग-
चौपदरीकरणावर सुविधाचा अभाव, रखडलेली निकृष्ट काम, सुरक्षा मानकांप्रमाणे न झालेले काम, वळण रस्त्यावरचे धोकादायक क्रॉसिंगमुळे जसे मुख्य महामार्ग अपघाताचे केंद्र झाले आहे. तसाच धोकादायक मार्ग वळण रस्त्याचा झाला आहे. वळण रस्ता वाहतुकीसाठी खुला केल्यापासून आजपर्यंत किमान वीस अपघात झाले असून यात सहा ते सात जणांचा मृत्यू झाला आहे तर पंधरा जण गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

दरम्यान अधिकारी व कंपनीने तांत्रीकदृष्टीने काम झाल्याचे सांगून घाईघाईने रस्ता वाहतूकीसाठी चालू करून टोल वसुली सुरू केली आहे मात्र ठिकठिकाणी सूरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या नाहीत. हॉटेल सोनाई समोर बाह्यवळण रस्त्याचे प्रवेशाचे ठिकाण धोकादायक ठरले आहे. जाणाऱ्या - येणाऱ्या वाहनांचे वेगावर नियंत्रण नसते. गतीरोधक निकामी झाल्याने अपघात होत आहेत.

भागिरथी हॉटेलजवळील   बाह्यवळणाचे ठिकाण तर मृत्यूला आमंत्रण देणारे ठरले आहे, या ठिकाणी सूरक्षिततेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना नसल्याने अपघात वाढले आहेत. या ठिकाणी चौघांचा नाहक बळी गेला आहे. दोन दिवसापूर्वी दोन दुचाकीच्या धडकेत दोघे गंभीर झाले होते. भारतीय राष्ट्रीय महामार्ग व संबंधित ठेकेदाराने बाह्य वळणाच्या दोन्ही ठिकाणी सूरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजनेचा अवलंब करणे गरजेचे असून, प्रत्यक्षात तसे झाले नाही तर आणखी लोकांचा बळी जाईल अशी भिती व्यक्त केली जातेय.
 

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com