भारनियमन पाचवीला पुजलेलेच; त्यात वीज जोडणी मिळेना, शेतकऱ्यांच्या नशीबी मरण यातना !

umarga news 03.png
umarga news 03.png

उमरगा (उस्मानाबाद) : निसर्गाचे ऐनवेळी येणारे संकट त्यात ओलिताखालील शेती क्षेत्रासाठी करावी लागणाऱ्या धावपळीने शेतकऱ्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. दुष्काळ, नापिकीमुळे अनेक शेतकरी आत्महत्या करताहेत. ग्रामीण भागात भारनियमनाची झंझट पाचवीला पुजलेली आहे. प्रतीक्षा करूनही वीज जोडणी मिळत नसल्याने तात्पूरत्या वीज उपलब्धतेसाठी प्रयत्न करणाऱ्या कडदोरा (ता.उमरगा) येथील बाप - लेकाचा वीजेच्या धक्याने दुर्देवी मृत्यू झाला. दरम्यान हा मृत्यू महावितरण व वीज यंत्रणा उभी करणाऱ्या संबंधित ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे झाल्याची संतप्त भावना शेतकऱ्यांतून व्यक्त केली जातेय.

उमरगा तालुक्यात कोरडवाहू शेतीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. शेती सिंचनासाठी येण्यासाठी प्रकल्पाची संख्या ३२ आहे. मात्र अपुऱ्या पावसामुळे पाण्याची सोय उपलब्ध नसल्याने ओलिताखालील क्षेत्र येण्यासाठी शेतकऱ्यांना जेमतेम पाण्याचा पर्याय उपलब्ध करून घ्यावा लागतो आहे. त्यात भारनियमनाचा खोडा सतावत आहे.

२७० शेतीपंपाची जोडणी प्रतिक्षेत !
तालुक्यातील २७० शेतकऱ्यांनी शेतीपंपाच्या वीज जोडणीसाठी महावितरणकडे अनामत रक्कम भरलेली आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना सिंगल डीपीतुन वीज जोडणी देण्याचे धोरण असल्याने २२५ वीज जोडणीसाठी उभारण्यात येणाऱ्या यंत्रणेचे कंत्राट व्होल्टाज कंपनीला देण्यात आले आहे. २३ ऑक्टोबर २०१८ रोजी कंपनीला कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. त्या कामाची मुदत २२ जानेवारी २०२० पर्यंत होती. मात्र वेळेत यंत्रणा उभी राहू शकली नाही, त्यामुळे कामाला मुदतवाढ देण्यात आली आहे; तरीही आतापर्यंत ६५ शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळाली आहे. उर्वरीत शेतकऱ्यांना वीज जोडणीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. 

सुरुवातीपासूनच धिम्या गतीने काम सुरु होते. आता लॉकडाउनमुळे मजूर नसल्याचे कारण सांगितले जात आहे. दरम्यान कडदोरा येथील काशीनाथ रणखांब यांच्या शेताजवळ खांब उभे करण्यात आले, सिंगल डिपीचे काम गतीने पूर्ण होत नव्हते. वीज जोडणीसाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता मात्र जोडणी मिळत नव्हती. त्यामुळे काशीनाथ व अमोल या बाप-लेकाने तात्पुरत्या वीज जोडणीचा प्रयत्न करताना दुर्देवाने त्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. या प्रकारात महावितरणचे दुर्लक्ष आणि संबंधित ठेकेदाराने लवकर यंत्रणा उभी केली नसल्याने शेतकऱ्यांचा नाहक जीव गेल्याची संतप्त भावना ग्रामस्थातून व्यक्त केली जातेय.

शेतीपंपाच्या वीज जोडणीसाठी संबंधित ठेकेदाराने जलद गतीने यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे. कडदोऱ्याच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत घडलेला प्रकार दुर्देवी आहे. ठेकेदाराला कामासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे, त्यांनी गतीने काम करायला हवे, तशी त्यांना सूचना देण्यात आली आहे.

-  राजेंद्र शेंडेकर, उप कार्यकारी अभियंता 

 शेतीपंपासाठी अधिक दाबाने वीजपुरवठा यंत्रणा उभी करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र यंत्रणा गतीने उभी केली जात नाही. शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या यंत्रणेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.

- प्रा. सुरेश बिराजदार, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com