बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर विनाअनुदानित शिक्षकांचा बहिष्कार 

बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर विनाअनुदानित शिक्षकांचा बहिष्कार 

औरंगाबाद - विनाअनुदानित शाळांना अनुदान द्यावे, या मागणीसाठी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे निकाल उशिरा लागण्याची शक्‍यता निर्माण झाली असून, हा बहिष्कार मागे घेतला नाही, तर संबंधित संस्थेची मंडळ मान्यता रद्द करण्यात येईल. शिवाय त्यांच्या संस्थेतील बारावीच्या परीक्षार्थींचा निकालही राखीव ठेवणार असल्याचा इशारा बोर्डाने पत्राद्वारे संबंधितांना दिला आहे. 

महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवा शर्ती) नियमावली 1981 अनुसूची "अ'मधील नियम 22 (1) मधील मुख्याध्यापक, शिक्षक कर्मचारी यांच्यासाठी विहित केलेल्या कर्तव्यानुसार विभागीय मंडळाकडून सोपविण्यात आलेले परीक्षेच्या संदर्भातील कोणतेही काम करणे हे कर्तव्य आहे, असे परीक्षा बोर्डाकडून सांगण्यात आले. असे असतानाही विभागातील चारही जिल्ह्यांतून शुक्रवारी (ता. 24) विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांनी 700 पेक्षा जास्त गठ्ठे म्हणजेच दोन ते अडीच हजार पेपर बोर्डात परत पाठविले. त्यामुळे निकाल वेळेवर लागेल की नाही, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

परत आलेल्या गठ्ठ्यांची विभागनिहाय स्थिती 
- मुंबई ः 4 गठ्ठे 
- कोल्हापूर ः 16 
- पुणे ः 150 
- औरंगाबाद ः 700 

पेपर परत पाठविण्यात औरंगाबाद आघाडीवर 
सर्वांत जास्त औरंगाबाद जिल्ह्यातून; तर सर्वांत कमी हिंगोली जिल्ह्यातून गठ्ठे आलेत. 80 गुणांचा पेपर असेल तर शिक्षकांना प्रत्येकी 200 ते 250 उत्तरपत्रिका आणि 40 गुणांचा असेल तर 250 ते 300 उत्तरपत्रिका दिल्या जातात. दहावीचे पेपर तपासणाऱ्या शिक्षकांचे अपघात, शिवाय घरी दुःखद घटना घडल्याने विभागातून 10 ते 12 गठ्ठे परत आल्याचे बोर्डातर्फे सांगण्यात आले. 

10 ते 12 एप्रिलपर्यंत बारावीचे पेपर तपासण्याचे काम पूर्ण व्हायला हवे. उत्तरपत्रिका वेळेवर तपासल्या जाव्यात यासाठी बोर्डाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, विनाअनुदानित शिक्षकांनी पेपर तपासले नाहीत तर संबंधित संस्थेवर कारवाई करण्यात येईल. त्यासाठी सात दिवसांच्या आत खुलासा मागविला आहे. 
- शिशिर घोनमोडे, विभागीय अध्यक्ष, परीक्षा मंडळ, औरंगाबाद. 

दहा वर्षांपासून मी विनावेतन काम करीत आहे. अनुदानासाठी मूल्यांकन प्रक्रियाही झाली. मात्र, शासनाने अनुदान पात्र म्हणून संस्थेला घोषित केले नाही. जोपर्यंत अनुदान मिळणार नाही तोपर्यंत आमचा बहिष्कार कायम राहील. 
- अमर मोरे, विनाअनुदानित शिक्षक, हिंगोली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com