औरंगाबाद - "राफेल विमान खरेदीत कुठलाही गैरप्रकार झालेला नसून, ती प्रक्रिया नियमाप्रमाणे झाली. संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या 2013 च्या नियमावलीनुसार ती झाली होती, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
राफेल लढाऊ विमान खरेदीप्रक्रियेत सरकारने गैरव्यवहार केल्याचा आरोप कॉंग्रेसतर्फे करण्यात येत आहे. याविषयी रविवारी (ता. 16) माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राफेल खरेदीप्रक्रियेचे सादरीकरण केले. देशभरात अशाच प्रकारे राफेलवर कॉंग्रेस आक्रमक झाली आहे.
याला उत्तर देण्यासाठी सत्ताधारी पक्षातर्फे देशभरात पत्रकार परिषदा घेण्यात आल्या. गृहमंत्री अहिर म्हणाले, की स्वच्छ प्रतिमेचे सरकार म्हणून जनता मोदी सरकारकडे पाहते. राफेलविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिका फेटाळत सर्वोच्च न्यायालयाने सरकारला "क्लीन चिट' दिली आहे. सरकारकडून अथवा नेत्याकडून "ऑफसेट' भागीदारी निवड करताना कसलाही हस्तक्षेप झालेला नाही, यात कुठलीही अनियमितता दिसून आली नाही, असेही न्यायालयाने सांगितल्याचे अहिर यांनी नमूद केले.
पत्रकार परिषदेस आमदार अतुल सावे, प्रवक्ते शिरीष बोराळकर आदी उपस्थित होते.
कॉंग्रेसला देशप्रेमापेक्षा सत्ताप्रेम
'देशाच्या संरक्षणासाठी लढाऊ विमानांची गरज आहे. ते खरेदीसाठी "यूपीए' सरकारने विलंब केला. राफेलची खरेदीप्रक्रिया 2007 पासून सुरू झाली. तरी 2013 पर्यंत विलंब केला. विमान खरेदी न करता खरेदी करणाऱ्या सरकारवर आरोप लावणे, हा देशाच्या सुरक्षेत हस्तेक्षप आहे. कॉंग्रेसला देशप्रेम नाही, त्यांना फक्त सत्ताप्रेम आहे. वाट्टेल ते आरोप करीत प्रामाणिक पंतप्रधानांना बदनाम करण्यात येत आहे. यात कॉंग्रेसचे नेते विनापुरावे आरोप करीत आहेत, असे सांगत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही अहिर यांनी टोला लगावला.
|