परभणी ः राज्यात कोरोना विषाणु संसर्गांची परिस्थितीत हाताळण्यात राज्यातील ठाकरे सरकार सपशेल अपयशी ठरले असून सरकारच्या या अपयशी धोरणामुळे राज्य महाभयंकर संकटात सापडल्याचा आरोप करत शुक्रवारी (ता.२२) भाजपच्यावतीने महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. भाजपच्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी आपआपल्या घरासमोर बसून हे आंदोलन केले.
परभणी जिल्ह्यातील भाजपच्या आमदार मेघना साकोरे - बोर्डीकर यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयासमोर शुक्रवारी (ता.२२) सकाळी धरणे आंदोलनास सुरुवात केली. या वेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी तोंडाला काळे रुमाल गुंडाळून राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध केला.
घोषणा आणि फलक हाती
हातात राज्य सरकार जागे व्हा, जनतेच्या आरोग्याशी खेळणे बंद करा, चला बळीराजाला बळ देऊ, कापूस विक्री आणि पिक कर्जासाठी साथ देऊ असे फलक घेवून हे सर्वजण आंदोलनात सहभागी झाले होते. त्याचबरोबर माजी आमदार रामराव वडकुते यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रमोद वाकोडकर, प्रदेश सरचिटणीस रामकिशन रोंदळे, अजय गव्हाणे, भीमराव वायवळ, गणेश काजळे भालचंद्र गोरे, चंद्रकांत डहाळे यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
हेही वाचा - Video : ६० दिवसानंतर धावली लालपरी
अनेकांनी घरासमोर केले आंदोलन
दुसरीकडे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अभय चाटे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या घरासमोर महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात दिनेश नरवाडकर यांच्यासह इतर सहभागी झाले होते. ग्रामीण भागात जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी बालाप्रसाद मुंदडा, बाळासाहेब भालेराव यांची उपस्थिती होती.
सरकारने ठोस पाऊले उचलले नाही
राज्यातील ठाकरे सरकार हे अकार्यक्षम ठरले आहे. राज्यातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे केवळ राज्य सरकारच्या अकार्यक्षम पध्दतीमुळेच झाले आहे. कोरोनाच्या महामारीवर कोणतेही ठोस पाऊले सरकारने उचलले नाहीत. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देखील सरकार गंभीर दिसत नाही. त्यामुळे आम्ही राज्य सरकारच्या कार्यपध्दतीचा निषेध करत आहोत.
- मेघना साकोरे - बोर्डीकर, आमदार जिंतूरराज्यात आरोग्य अराजक पसरले
कोवीड महामारीवर प्रभावी उपाययोजना आणि प्रशासकीय नियंत्रण ठेवण्यात महाराष्ट्र सरकार पुर्णपणे अपयशी ठरल्याने राज्यात आरोग्य अराजक पसरले आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या जबरदस्त विळखा राज्याला बसत आहे. कोविड विषाणु अकार्यक्षम, सुस्त सरकारी यंत्रणेला पोखरून काढत आहे. - रामराव वडकुते, माजी आमदार, भाजपसरकार सर्व आघाड्यावर अपयशी
हे सरकार सर्व आघाड्यावर अपयशी ठरले आहे. त्यामुळे आम्हाला आंदोलन करून सरकारला जागे करण्याची वेळ आली आहे. राज्यातील कोरोना विषाणुची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ठाकरे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांच्या कापसाबद्दल ही सरकारचे धोरण योग्य नाही. - अभय चाटे, माजी जिल्हाध्यक्ष, भाजप
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.