अजबच... शाखा नसलेल्या बॅंकेला जोडले गाव

file photo
file photo

कळमनुरी( जि. हिंगोली) : तालुक्यातील देवदरी शिवारात असलेल्या जवळपास सहाशे शेतकऱ्यांना पीककर्ज मिळविण्यासाठी शहरात शाखा नसलेल्या ॲक्सिस बँकेला जोडण्यात आले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना पीककर्जासाठी हिंगोली येथील शाखेत येरझारा घालाव्या लागत असल्याने त्‍यांना शहरातील बँकेकडून पीक कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

तालुक्यातील देवदरी या बेचिराख गावाची नोंद असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांची शेतीविषयक कामे व्हावी यासाठी वाई ग्रामपंचायतला हा परिसर जोडण्यात आला आहे. दरवर्षी या भागातील शेतकऱ्यांना पीककर्जासाठी अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. 

७२९ हेक्टर शेत जमिनीची नोंद

हिंगोली येथील लिड बँकेकडून यावर्षी या भागातील शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी हिंगोली शहरातील ॲक्सिस बँकेची निवड केली आहे. देवदरी परिसरात शासन दरबारी ७२९ हेक्टर शेत जमिनीची नोंद असून या भागातील जवळपास सहाशे शेतकरी खरीप व रब्बी हंगाम घेतात.


प्रशासनाकडे मांडले गाऱ्हाणे

 खरीप हंगामामध्ये पीक कर्ज मिळविण्याकरिता गावाची नोंद बेचिराख असल्यामुळे अडचणीस तोंड द्यावे लागत असल्याचे वास्तव आहे. मागील हंगामात पीक कर्ज मिळण्यात आलेल्या अडचणी पाहता या भागातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे गाऱ्हाणे मांडले होते.

ॲक्सिस बँकेची निवड केली 

 त्यानंतर शहरातील एसबीआय व बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेमधून पीक कर्ज देण्यात आले. मात्र या वर्षी या बँकेकडून पीक कर्ज देण्यास नकार देत हिंगोलीतील ॲक्सिस बँकेची निवड केली असल्याचे सांगण्यात आले. 

कळमनुरी शहरातील बँकेशी जोडावे 

त्यामुळे शेतकऱ्यांना आता पीक कर्ज मिळवण्यासाठी पहिल्यापासून सुरुवात करावी लागत आहे. आता ऐन पेरणीच्या दिवसात शेतकरी पीक कर्जासाठी ॲक्सेस बँकेमध्ये चकरा मारत आहेत. कळमनुरी शहरातील बँकेशी हा परिसर जोडून देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे.

उमरखोजा येथे बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी

हिंगोली : तालुक्‍यातील उमरखोजा येथे नुकतीच रुंद वरंबा सरी (बीबीएफ) यंत्राच्या साहायाने सोयाबीन पिकाची पेरणी करण्यात आली. या वेळी तालुका कृषी अधिकारी जी. बी. बंटेवाड व मंडळ कृषी अधिकारी गणेश कच्छवे यांनी गावात सभा घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. 

एकरी सात ते आठ किलो बियाणाची बचत

बीबीएफ यंत्राने पेरणी केल्यास एकरी सात ते आठ किलो बियाणाची बचत होते. पिकात हवा व सूर्यप्रकाश खेळता राहिल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. तसेच पावसाचा खंड पडल्यास सऱ्यांमध्ये साठवलेल्या पाण्यावर पीक तग धरून राहते. पाऊस जास्त झाल्यास सऱ्यांमधून जास्तीचे पाणी शेताबाहेर निघून जाते आदी फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगितले. 

सोयाबीनची पेरणी केली

तसेच बीबीएफचे प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखवले. त्याचाच परिणाम म्हणून उमरखोजा येथील शेतकरी विजयकुमार चौधरी यांनी यंत्राच्या साहायाने सोयाबीनची पेरणी केली. या वेळी कृषी पर्यवेक्षक श्री. नाईक, श्री. इढोले, श्री. सदार, श्री. इंगळे, श्री. पवार व समूह सहायक जीवक खंदारे उपस्थित होते.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com