‘कोरोना’च्या धास्तीमुळे गावकरी, विद्यार्थी परतले

‘कोरोना’च्या धास्तीमुळे गावकरी, विद्यार्थी परतले

कळमनुरी (जि. हिंगोली) : तालुक्यातील ग्रामीण भागांतून कामासाठी स्थलांतर करणाऱ्या शेकडो नागरिकांनी कोरोना विषाणुजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे भागातून आपल्या मूळ गावी परतायला सुरवात केल्यामुळे परत आलेल्या नागरिकांभोवती संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाला आता ग्रामीण भागांमधूनही या आजारासंदर्भात जनजागृती करून काळजी घेण्याची वेळ आली आहे.

कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे सर्वत्र भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. या आजाराचा संसर्गाचा प्रादुर्भाव व फैलाव होणार नाही याची काळजी घेण्याकरिता प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना व खबरदारी घेण्यात येत आहे. या संसर्गजन्य आजाराचा फैलाव होणार नाही याकरिता राज्य शासनाने शाळा, महाविद्यालयांना सुट्या देत सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करून कोरोना आजाराला पायबंद घालण्याची तयारी केली आहे.

जनजागृतीसाठी संस्थांचा पुढाकार

त्या दृष्टीने जिल्ह्यातील आठवडे बाजार, यात्रा, सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीवर प्रतिबंध घातले आहेत व या आजाराबाबत जनजागृती करण्याकरिता स्थानिक स्वराज्य संस्था व सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांनी पुढाकार घेतला आहे. या स्थितीत शहर व ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना कोरोना विषाणुजन्य आजारासंदर्भात माहिती झाली आहे. जो तो नागरिक आपल्या परीने या आजारापासून लांब राहण्याकरिता आवश्यक त्या उपाययोजनांची अंमलबजावणी करीत आहे.

परतलेल्या गावकऱ्यांबाबत संशय

 दरम्‍यान, कळमनुरी शहर व तालुक्यामधील ग्रामीण भागांमधून कामासाठी मुंबई, पुणे येथे स्थलांतर केलेल्या नागरिकांनी आता या आजाराच्या पार्श्वभूमीवर गावाकडे परतायला सुरवात केल्यानंतर संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील ग्रामीण भागांमधून मोठ्या संख्येने नागरिक कामासाठी पुणे व मुंबईला वास्तव्याला होते. गावपातळीवर पुणे व मुंबईहून परत आलेल्या नागरिकांबाबत संशय व्यक्त केला जात आहे. दुसऱ्या बाजूला नागरिकांचा संशय पाहता प्रशासनालाही या बाबीची आता दखल घ्यावी लागणार असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे शहर व ग्रामीण भागातील नागरिकांची आरोग्य व्यवस्था सांभाळणाऱ्या संस्थेवर मोठी जबाबदारी येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कामानिमित्त झाले होते स्थलांतरीत

वारंगा : कळमनुरी तालुक्‍यातील वांरगाफाटा परिसरातील अनेक गावकरी काही दिवसांपासून कामानिमित्त पुणे, मुंबई, नाशिक आदी शहरांत गेले होते. मात्र, कोरोना विषाणूच्या भीतीमुळे गावकरी गावाकडे परतत आहेत. मात्र, गावात गावातील इतर ग्रामस्थ संशयाच्या नजरेने पाहत असल्याचे चित्रही पाहावयास मिळत आहे. कळमनुरी तालुक्‍यातील तोंडापूर, कुंभारवाडी, वारंगाफाटा, उमरदरवाडी आदी गावांतील तरुण कामासाठी व काही शिक्षणासाठी पुणे, औरंगाबाद, मुंबई, नाशिक आदी शहरांत गेले होते. 

विद्यार्थीही गावाकडे परताहेत

काही दिवसांपासून कोरोना विषाणूची दशहत निर्माण झाल्याने शहरातील गर्दीच्या ठिकाणची कामे बंद होत आहेत. शाळा, महाविद्यालयांना सुट्या जाहीर केल्याने विद्यार्थीही गावाकडे परतत आहेत. कोरोना विषाणूमुळे गावकरी शहरी भागात जाणेदेखील टाळत आहेत. आता आपल्याच गावातील आपले नातेवाईक गावात दाखल होत असल्याने त्‍यांची शंका निर्माण होत असल्याचे चित्र आहे.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com