बीड : प्रकल्पात गेलेल्या जमिनीच्या मावेजासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवूनही न्याय न मिळाल्याने जाळून घेतलेल्या अर्जुन साळुंके (वय ३५, रा. पाली) यांचा मृत्यू झाला. त्यानंतर न्यायासाठी पत्नीनेही कार्यालयाचे उंबरठे झिजवले तरीही कोणी दाद देईना म्हणून उपोषणाला बसूनही कोणी लक्ष देत नसल्याने अखेर महिला झाडावर चढल्याची घटना मंगळवारी (ता.पाच) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Beed) घडली. परिसरातील पाली येथील बिंदुसरा धरणाच्या कर्मचारी वसाहतीसाठी सोळुंके कुटूंबियांची जमिन १९५६ साली अधिगृहीत झाली. जमिनीच्या मावेजासाठी राधाबाई साळुंके यांनी अनेक वर्षे मंत्रालयापासून, जिल्हाधिकारी कार्यालय, आयुक्त व पाटबंधारे विभागात पाठपुरावा केला. त्यांनी मंत्रालयात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने त्यांना अटकही झाली. मात्र, न्याय मिळाला नाही. याच प्रयत्नांच्या (Justice For Common Man) दरम्यान त्यांचा अपघाती मृत्यू झाला. पुढे त्यांचा मुलगा अर्जुन साळुंके यांनीही यासाठी शासकीय कार्यालयांत खेटे सुरु केले.
संबंधित कार्यालयांतून न्याय न मिळाल्याने ता. १३ ऑक्टोबर २०२० रोजी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन ता. १६ ऑक्टोबरला आत्मदहनाचा इशारा दिला होता. यावरही कुठली कारवाई न झाल्याने अखेर अर्जुन साळुंके यांनी ता. २४ ऑक्टोबर २०२० रोजी पाटबंधारे कार्यालयाच्या आवारात अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेतले. यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद झाला. मात्र, पुढे काहीच झाले नाही. अखेर त्यांच्या पत्नी तारामती साळुंके यांनी ता. दोन ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले. मात्र, त्यांच्या आंदोलनाची कोणीही दखल घेतली नाही. अखेर मंगळवारी (ता. पाच) सकाळी त्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील एका झाडावर चढल्या. पोलिसांनी हस्तक्षेप व विनंत्या करुन त्यांना खाली उतरविले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.