बांगड्या विकून मिळवली डॉक्टरेट, लातूरच्या युवकाचा प्रेरणादायी प्रवास

बांगड्या विकून मिळवली डॉक्टरेट, लातूरच्या युवकाचा प्रेरणादायी प्रवास

अहमदपूर ः  आर्थिक परिस्थिती बेताचीच असतानाही, उपजीविकेसाठी बांगडी विक्रीचा व्यवसाय करणारे अखिल मणियार यांनी ज्ञानसाधनेचा ध्यास घेतला असून, नुकतीच त्यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने पीएच.डी. बहाल केली आहे. त्यामुळे वयाच्या तिसाव्या वर्षी आता ते डॉक्‍टर झाले आहेत. 


मूळ जळकोट (जि. लातूर) तालुक्‍यातील रहिवासी असणारे अखिल यांचे वडील बाबूलाल मणियार हे व्यवसायानिमित्ताने चाळीस वर्षांपूर्वी अहमदपुरात स्थायिक झाले. त्यांना एकूण दोन मुले आणि सात मुली आहेत. पैकी सहा मुलींची लग्न झाली आहेत. त्यामुळे त्यांचे कुटुंब तसे मोठेच. आजही बाबूलाल यांना पोस्ट लाईनला असणाऱ्या छोट्या दुकानात त्यांची दोन मुले शकील आणी अखिल हे बांगडी विक्रीच्या व्यवसायात त्यांना मदत करतात. 


पाचवीपासूनच अखिल यांनी विविध व्यवसाय करण्यास सुरवात केली; मात्र आता ते पिढीजात असणाऱ्या बांगडी विक्रीच्या व्यवसायात स्थिरावले आहेत. याआधी नोकरी मिळावी, या उद्देशाने अखिल यांनी डी.एड. पूर्ण केले; परंतु नोकरी न मिळाल्याने त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन बी.एड.चा अभ्यासक्रमही पूर्ण केला; मात्र डोनेशनची मागणी पूर्ण न करू शकल्यामुळे ते नोकरीपासून वंचित राहिले. 


यानंतर अखिल यांनी उदगीर येथील उदयगिरी महाविद्यालयातून हिंदी या विषयात, तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून समाजशास्त्र या विषयात एम.ए. पूर्ण केले; मात्र एवढ्या पदव्या मिळवूनही नोकरी त्यांच्यापासून कोसोमैल दूरच होती. 


उच्चशिक्षित असूनही नोकरी नाही म्हणून खंत वाटत असतानाही अखिल यांनी वर्ष 2016 मध्ये उदगीर येथील उदयगिरी महाविद्यालयाचे हिंदी विभागप्रमुख डॉ. बी. एस. भुक्तरे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनास सुरवात केली; तसेच "अब्दुल बिस्मिल्लाह के उपन्यासों मे व्यक्त मुस्लिम विमर्श' हा प्रबंध सादर केला. या प्रबंधास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने नुकतीच मान्यता देऊन त्यांना पीएच.डी. ही पदवी बहाल केली आहे. 

हेही वाचा - बाइकमध्ये पेट्रोलऐवजी डिझेल टाकले तर...? जाणून घ्या
शिक्षण घेण्याची जिद्द असेल तर आर्थिक परिस्थिती त्याला अडसर ठरू शकत नाही, हे अखिल मणियार यांच्या उदाहरणावरून दिसून येते. 



उच्चशिक्षित असूनही नोकरी मिळत नाही, याची मनापासून खंत वाटते; मात्र आपण शिक्षणाचा घेतलेला वसा सोडणार नसून, यापुढेही शिकतच राहणार आहोत. 
- डॉ. अखिल मणियार  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com