विरार - अवघा देश गुरुवारी रंगोत्सवात रंगलेला असताना नालासोपारा, मुंब्रा आणि बदलापूर आणि कर्जतमध्ये या उत्साहास गालबोट लागले. रंगांच्या उधळणीनंतर कुटुंबीय तसेच मित्रांसोबत आणखी मौजमजा करण्यासाठी विविध ठिकाणी पोहण्यासाठी गेलेले आठ जण बुडाले. त्यापैकी दोघांचे मृतदेह सापडले. इतरांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता.
वसई पश्चिमेकडील गोकुळ पार्क येथे राहणारे मौर्य आणि गुप्ता या कुटुंबांतील काही सदस्य गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास नालासोपारा येथील कळंब किनाऱ्यावर सहलीसाठी गेले होते. त्यापैकी काही जण पोहण्यासाठी समुद्रात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने त्यापैकी पाच जण बुडाले. ही माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिकांच्या मदतीने बचाव मोहीम राबवली. सायंकाळी सातच्या सुमारास प्रशांत मौर्य (20) याचा मृतदेह सापडला. अन्य चौघांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. निशा मौर्य (40), प्रिया मौर्य (18), कांचन गुप्ता (38), शीतल गुप्ता (32) अशी त्यांची नावे आहेत.
दिवा-साबे गावात राहणारा करण गौतम (21) धुळवड खेळल्यानंतर काही मित्रांसह मुंब्रा अग्निशमन केंद्रानजीकच्या चुहा पुलाजवळील खाडीत पोहण्यासाठी गेला होता. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी सायंकाळी त्याचा मृतदेह बाहेर काढला.
बदलापूरमधील कात्रप परिसरात राहणारे कल्पेश चौधरी आणि कार्तिक लाडी हे दोन तरुण धूलिवंदन केल्यानंतर अंघोळीसाठी उल्हास नदीवरील बॅरेज बंधाऱ्यावर गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने कल्पेश बुडू लागला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात कार्तिकही बुडाला. बदलापूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेत होते.
मुंबईतील घाटकोपर येथे राहणारे सिंग कुटुंब होळीनिमित्त कर्जतनजीक पाषाणे येथे राहणाऱ्या नातेवाइकाकडे गेले होते. धूलिवंदन केल्यानंतर ते दुपारी दीडच्या सुमारास नजीकच्या उल्हास नदीच्या पात्रात उतरले.
त्यापैकी विनय श्यामनाथ सिंग आणि देवेंद्र बिध्यय सिंग बराच वेळ बाहेर न आल्याने इतरांनी स्थानिकांच्या मदतीने त्यांचा शोध घेण्यास सुरवात केली. त्यात यश न आल्याने नेरळ येथील "आपाद्ग्रस्त मदतीसाठी' या ग्रुपच्या जीवरक्षकांच्या मदतीने पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ही मोहीम सुरू होती.
|