
कोरोना काळात लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर रेल्वे मार्गावरील मृत्यूंमध्ये घट झाली आहे
मुंबई : कोरोना काळात लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर रेल्वे मार्गावरील मृत्यूंमध्ये घट झाली आहे. रेल्वे प्रवाशांच्या संख्येत झालेली घट आणि मुंबई उपनगरीय रेल्वेगाड्यांमधून प्रवास करण्यास सामान्यांना केलेला मज्जाव ही यामागील कारणे आहेत. 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये 65 टक्क्यांनी मृत्यूचे प्रमाण घटले आहे.
मुंबई उपनगरी रेल्वेगाड्यांमधून रोज 80 लाखांहून अधिक जण प्रवास करतात; मात्र कोरोना काळात रेल्वेसेवा बंद ठेवण्यात आली होती. 2020 मध्ये उपनगरी रेल्वे मार्गांवर रूळ ओलांडताना तसेच अन्य कारणांमुळे एकूण 1,116 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. या दुर्घटनेत 983 पुरुष आणि 133 महिलांचा समावेश आहे; तर 878 प्रवासी जखमी झाले. यात 688 पुरुष आणि 190 महिला प्रवाशांचा समावेश आहे. मध्य रेल्वेवर एकूण 523 प्रवाशांचा मृत्यू आणि 747 प्रवासी जखमी झाले. पश्चिम रेल्वे मार्गावर मार्गावर एकूण 369 प्रवाशांचा मृत्यू आणि 355 प्रवासी जखमी झाले आहेत.
माहिती अधिकार अधिनियमांतर्गत ही आकडेवारी प्राप्त झाली आहे. माहिती अधिकारी कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी अर्जाद्वारे ही माहिती मिळवली. मुंबई रेल्वे पोलिसांनी जानेवारी ते डिसेंबर 2020 पर्यंत उपनगरीय रेल्वेगाड्यांमधून पडून वा रूळ ओलांडताना झालेल्या मृत्यूंची माहिती पुरवली.
मृत्यू | जखमी | |
रूळ ओलांडताना | 730 | 129 |
चालत्या गाडीतून पडून | 177 | 361 |
खांबाचा फटका लागून | 2 | 12 |
फलाट व गाडीच्या पायदानाच्या मध्ये पडून | 1 | 1 |
विजेच्या धक्क्याने | 4 | 7 |
आत्महत्या | 27 | |
नैसर्गिक मृत्यू | 167 | 212 |
अन्य कारणाने | 6 | 155 |
अज्ञात कारणाने | 2 | 1 |
64 percent reduction in accidental deaths on railways Reduced accidents due to low number of passengers
----------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )