डोंबिवलीत ‘आपलं जेवण’ उपक्रमाची सुरुवात

डोंबिवलीत ‘आपलं जेवण’ उपक्रमाची सुरुवात
डोंबिवलीत ‘आपलं जेवण’ उपक्रमाची सुरुवात

डोंबिवलीः डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला की वधारला? पेट्रोल पुन्हा किती महागले? यापेक्षा आज मला काम मिळेल का? रोजंदारी मिळेल का? अशा चिंतेने ग्रस्त असलेल्या कष्टकरी वर्गाला, महागाईने ग्रासलेल्या कामगार वर्गाला पुरेशा जेवणा अभावी वडा-पाव वर स्वतःची गुजराण करणेही कठीण झाले आहे. अशा कामगारांना किमान चांगले जेवण कमी पैशात मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन लालबावटा रिक्षा युनियन, डोंबिवली आणि प्रमोद कोमास्कर स्मृती सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कष्टकरी वर्गाला दिलासा देण्यासाठी फक्त 20/- रुपयात ‘आपलं जेवण’ उपक्रम सुरु करण्यात आला. त्या ‘आपलं जेवण’ उपक्रमाचे महापौर विनिता राणे यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी उद्घाटन झाले. कामगार वर्गाला महपौरांच्या हस्ते पहिली जेवणाची थाळी देण्यात आली.

शहीद भगतसिंग जयंतीचे औचित्य साधून पूर्वेकडील डॉ. राथ रोड येथे ‘आपलं जेवण’ उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात महापौर विनिता राणे, विरोधी पक्षनेते मंदार हळबे, कॉम्रेड नेते प्रकाश रेड्डी, कॉम्रेड काळू कोमास्कर, बहुजन समाज पार्टी प्रदेश सचिव दयानंद किरतकर, रिक्षा युनियन नेते संजय मांजरेकर, दत्ता माळेकर आदी उपस्थित होते.

महापौर विनिता राणे म्हणाल्या, आपलं जेवण हा चांगला उपक्रम राबविण्यात आला आहे. जेवणात कोणताच पक्ष नसतो. पोटापाण्यासाठी जेवणाची पर्वा न करता येथील कामगार उपाशीही रहातात पण आता त्यांना या उपक्रमामुळे कमी पैशात पूर्ण जेवण मिळणार आहे ही मोठी गोष्ट आहे. तर बसपाचे दयानंद किरतकर म्हणाले, अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे. डोंबिवलीत खेडेगावातून पोट भरण्यासाठी कामाला येणाऱ्या नाका, रिक्षा कामगारांची संख्या मोठी आहे. या उपक्रमातील आपलं जेवण हे फक्त वीस रुपयात देतांना आयोजकांची दमछाक होणार आहे. या उपक्रमासाठी जो काही तुटवडा पडेल त्याच्या महिनाभरचा भार आम्ही नक्कीच पेलू असे सांगून उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी कॉम्रेड नेते प्रकाश रेड्डी म्हणाले, कष्टकरी कामगारांना कमी पैशात जेवण मिळणार आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. युनियन म्हटली कि फक्त पगारवाढ हा विषय घेऊन काम केले जाते. पण या लालबावटा रिक्षा युनियनचे पदाधिकारी कामगारांना कमी पैशात जेवण मिळावे यासाठी झटत आहेत.

या उपक्रमातून प्रतिदिन दुपारी 12 ते 2 या वेळेत किमान 200 कामगारांना फक्त 20 रुपयात डाळ, भात, भाजी असे सकस व ताजे ‘आपलं जेवण’ मिळणार आहे. शहरात या उपक्रमाच फायदा रिक्षाचालक, फेरीवाले, नाका कामगार, श्रमिक, कष्टकरी आणि बेरोजगार यांना मिळणार असून या उपक्रमाला अनेकांची मदत मिळत असल्याचे उपक्रम प्रमुख कॉम्रेड काळू कोमास्कर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com