फटाक्‍यांमुळे हवेचा दर्जा घसरला

फटाक्‍यांमुळे हवेचा दर्जा घसरला
फटाक्‍यांमुळे हवेचा दर्जा घसरला

नवी मुंबई : दिवाळीनिमित्ताने होत असलेल्या फटाक्‍यांच्या आतषबाजीमुळे नवी मुंबई शहराच्या हवेचा दर्जा घसरला आहे. विशेष म्हणजे वाढत्या ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांचा कमी आवाजाच्या आणि शोभेच्या फटाक्‍यांकडे वाढलेला कल याला कारणीभूत ठरला आहे. लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या दिवसांमध्ये हवा प्रदूषणाच्या उच्चांकाची नोंद ‘सफर’ या हवा तपासणाऱ्या संस्थेच्या संकेतस्थळावर झाली आहे. हवेत धुळीकणांचे प्रमाण वाढल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, अस्थमाचे रुग्ण आणि लहान मुलांची काळजी घेण्याचा इशारा सफर या संस्थेने दिला आहे.  
 
आर्थिक मंदी आणि फटाक्‍यांविरोधात सुरू असलेल्या जनजागृतीमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत नागरिकांचा फटाके खरेदीचा उत्साह काहीसा आटलेला होता. तसेच दिवाळीच्या काळात फटाक्‍यांमुळे होत असलेले ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी स्वयंसेवी संस्थांकडून जास्त आवाजाचे फटाके खरेदी न करण्याची जनजागृती मोठ्या प्रमाणात केली जाते. ध्वनिप्रदूषणामुळे अनेकांनी आपल्या लहान मुलांसाठी आणि गृहिणींनाही सोपे होईल, असे कमी आवाजाचे आणि शोभेचे फटाके खरेदी करण्याकडे कल वाढलेला आहे. 

दिवाळीच्या तीन ते चार दिवसांत हवाप्रदूषणामुळे दर्जा घसरल्याची नोंद झाली. २८ ऑक्‍टोबरला बलिप्रतिपदेच्या दिवशी हवा खराब झाल्याचे सफर संकेतस्थळावर नोंदविण्यात आले. खराब हवेचे प्रमाण २८ ऑक्‍टोबरनंतर २९ ऑक्‍टोबरलाही नोंदवण्यात आले. मंगळवारीच्या दिवशी हवेत धुलीकणांची सर्वाधिक नोंद झाल्याने दर्जा अधिक घसरलेला होता. पीएम २.५ प्रकारातील धुलीकणांचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले. फटाके फोडताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नियमांचे पालन नवी मुंबईत झालेले दिसून येत नाही. जिल्हाधिकारी व संबंधित यंत्रणांनी हवा प्रदूषण कमी करण्याची काळजी घ्यायला हवी. असे वातावरण फाऊंडेशनचे संस्थापक भगवान केसभट यांनी सांगितले.

पीएम २.५ म्हणजे काय? 
पीएम २.५ म्हणजे अतिसूक्ष्म धुलीकण होय. दुर्बिणीने दिसणाऱ्या अतिसूक्ष्म धुलीकणांची नोंद पीएम २.५ मध्ये मोजली जाते. धुलीकणांचे प्रमाण अतिशय जास्त असल्यास श्‍वास घेण्यास त्रास होणे, हृदय आणि फुप्फुसाचे आजार होणे, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना त्रास होण्याची शक्‍यता सफर या संकेतस्थळावर नमूद केली आहे. हे धुळीकणांचे प्रमाण गेले दोन ते तीन दिवस २५७ ते ३११ पर्यंत मोजले गेले आहे. 

हवेचा घसरलेला दर्जा आणि वाढलेल्या धुलीकणांमुळे ज्या व्यक्तींना फुप्फुसांचे आजार होते. त्यांना पुन्हा संसर्ग होण्याची शक्‍यता आहे. अस्थमा रुग्णांनी फटाके फोडलेल्या ठिकाणी जाणे टाळलेले बरे. घसा बसणे, नाक कोंडणे, छातीची धडधड वाढणे अशा प्रकारची लक्षणे जाणवू शकतात. अशा परिस्थितीत घरात गरम पाण्याची वाफ घेणे, हा सर्वात चांगला उपाय आहे.   
- डॉ. महेश पडसळगे, नवी मुंबई.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com