मुंबई - साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे पत्राचाळ, चिरागनगर, घाटकोपर येथील स्मारक हे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने म्हाडाच्या सहकार्याने उभारावे, असा निर्णय सोमवारी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला.
हे स्मारक अण्णा भाऊंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या अनुषंगाने लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाचे राज्यमंत्री तथा अण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे अध्यक्ष दिलीप कांबळे, उपाध्यक्ष मधुकर कांबळे, आमदार श्रीकांत देशपांडे आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, 'साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने करावे व त्याला "म्हाडा'चे सहकार्य राहील. या स्मारकामध्ये सुसज्ज असे ग्रंथालय, सभागृह तसेच स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी अकादमी असेल.''
|