मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकारची (MVA Government) सत्ता आल्यापासून हिंदू नाराज असून, हिंदूंच्या (Hindu) सणांवर निर्बंध घालून हिंदूंच्या आनंदावर विर्झन घालण्याचं काम केलं असल्याचा आरोप भाजपकडून (BJP) करण्यात येतोय. सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोपही भाजपने केला आहे. त्यातच आता गुढीपाडव्याला निघणाऱ्या शोभायात्रेसाठी, राम नवमीच्या मिरवणुका काढण्यासाठी आणि सण जल्लोषात साजरे करण्यासाठी परवानगी घेण्यासाठी भाजपच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस (Mumbai Police) आयुक्त संजय पांडे यांची भेट घेतली आहे.
भाजपने यावेळी मशिदीमधून अजानमुळे मुंबईकर नाराज असल्याचं देखील सांगितलं. ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात, मात्र ध्वनि प्रदूषणाचं मोठं कारण हे मशिदीवरून लाऊड स्पीकरने दिली जाणारी अजान असल्याचं मत भाजपच्या शीष्ट मंडळाने यावेळी व्यक्त केलं. मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, आमदार अतुल भातखळकर, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार राहुल नार्वेकर आणि इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलंय की, २ एप्रिल रोजी हिंदू नववर्षानिमित्त अनेक ठिकाणी यात्रेचं आयोजन केलं जातं. अशा यात्रेच्या स्वागतासाठी मुंबईत तयारी सुरु आहे. त्यामुळे या यात्रेला परवानगी द्यावी. तसंच रामनवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि हनुमान जयंती हे सण साजरे करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.