सावधान मुंबईकर! बेदरकार वाहनांमुळे पादचाऱ्यांना धोका; शहरात 39 ब्लॅक स्पॉट

सावधान मुंबईकर! बेदरकार वाहनांमुळे पादचाऱ्यांना धोका; शहरात 39 ब्लॅक स्पॉट


मुंबई : विक्रोळी येथे झालेल्या बेस्ट बसच्या अपघातानंतर मुंबईतील अपघात प्रवण क्षेत्रांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबईत 39 ब्लॅक स्पॉट असून महापालिकेच्या रस्त्यांवर 17 ब्लॅक स्पॉट आहे. गेल्या वर्षात मुंबईत रस्त्यावरील अपघातांत 447 जणांचा मृत्यू; तर 2 हजार 147 गंभीर जखमी झाले आहेत. मुंबईतील सर्वाधिक 1हजार 442 अपघात पादचाऱ्यांचे झाले आहेत. 

मुंबईचे रस्ते सुरक्षीत करणे तसेच अपघात प्रवण क्षेत्रांवर उपाय करण्यासाठी मुंबई महापालिकेने 2018 मध्ये रस्ते सुरक्षा ऑडीटर नेमण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अदयाप सल्लागाराची नियुक्ती झालेली नाही. आता महापालिकेने यासाठी निवीदा मागवल्या असून या निवीदा 27 ऑक्‍टोबर रोजी उघडणार आहेत. त्याच बरोबर मुंबई महापालिकेने पदपथ धोरण ठरवले आहे. जेणेकरुन पदपथावरून चालणे पादचाऱ्यांना सुलभ होणार आहे. मात्र, अद्याप या धोरणाची पुर्णपणे अमंलबजावणी झालेली नाही. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी महापालिकेच्या रस्ते विभागाचे प्रमुख अभियंते संजय दराडे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे वर्दळीच्या वेळीही दुचाकीस्वार सर्रास पदपथावरुन वाहाने चालवत असतात. 
मुंबईतील 39 हॉटस्पॉट पैकी 17 हॉटस्पॉट मुंबई महापालिकेच्या रस्त्यांवर आहेत, अशी माहिती महापालिकेच्या 2020 -21 च्या अर्थसंकल्पात नमुद करण्यात आली आहे. तर, 19 ठिकाणी सर्वाधिक अपघात झाले आहेत. घाटकोपर ते विक्रोळी दरम्यान पुर्व द्रुतगती मार्गावर तब्बल 6 ब्लॅक स्पॉट आहेत. मुंबईत होणाऱ्या अपघातात प्रमुख कारण अतिवेग, लेन कटिंग आहे, अशी माहिती राज्य महामार्ग पोलिसांच्या अहवालत नमुद केली आहे. 

राज्य महामार्ग पोलिसांच्या अहवालानुसार 2019 मध्ये रस्त्यांवरील अपघातात 2019 मध्ये 2872 अपघातात 447 जणांचा बळी गेला आहे. तर, 2 हजार 2925 जण गंभीर जखमी झाले आहेत. 2018च्या तुलनेने अपघात आणि मृतांची संख्या कमी झाली आहे. 2018 मध्ये 3 हजार 162 अपघातात 475 जणांचा बळी गेला होता. तर, 3 हजार 292 गंभीर जखमी झाले होते. 

तारुण्यातच घात 
रस्ते अपघात बळी पडणाऱ्यांमध्ये सर्वाधिक संख्याही 25 वर्षापर्यंतच्या तरुणांची आहे. 25 वयोगटा पर्यंतच्या 133 जणांचा रस्त्यांवरील अपघातात मृत्यू झाला आहे. तर, 18 ते 25 या वयोगटातील मृतांची संख्या 102 एवढी असून 18 वर्षा पर्यंतच्या मृतांची संख्या 31 आहे. 

मुंबईत रस्ते बांधताना प्रामुख्याने वाहांनाच्या वाहतुकीचा विचार केला गेला आहे. पदपथ योग्य नसल्याने पादचाऱ्यांना रस्त्यांवरुन चालावे लागते. शहर विभागात पदपथांचे नियोजन बऱ्यापैकी आहे. मात्र, त्यातील अनेक पदपथ चालण्यासारखे नाही. उपनगरात तर पदपथ नसल्या सारखेच आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यांवरुन चालावे लागते. अनेक वेळा पदपथावरुनच वाहाने चालताना दिसताना. शहर नियोजनात रस्ते बनवताना पदपथाचा समावेश असणे गरजेचे आहे. 
- पंकज जोशी,
नगररचनाकार 

वाहतुक पोलिस आणि परीवहन विभागाने जानेवारीत प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार 19 ब्लॅक स्पॉटवर सर्वाधिक अपघात झाले आहेत. 

- 6 ब्लॅक स्पॉट हे घाटकोपर ते विक्रोळी दरम्यान पुर्व द्रुतगती मार्गावर. 
- एक ब्लॅक स्पॉट पुर्व द्रुतगती मार्गावरच ऐरोली पुल सर्व्हिस रोड डिव्हायडर 
- 5 ब्लॅक स्पॉट हे पश्‍चिम द्रुतगती मार्गावर. 
- चेंबूर ते विक्रोळी दरम्यान पुर्व द्रुतगर्ती मार्ग - पिरोजशा ब्रिज विक्रोळी, गोदरेज सोप गेट बस स्टॉप, घोडा गेट विक्रोळी पुर्व द्रुतगती मार्ग, घोडा गेट पुर्व 2 पुर्व द्रुतगती मार्ग विक्रोळी , घाटकोपर फ्लायओव्हर विक्रोळीच्या दिशेने, छेडानगर 
- पश्‍चिम द्रुतगती मार्ग - जागृती बस स्टॉप मालाड, टाईम्स ऑफ इंडिया ब्रिज मालाड, वनराई बस स्टॉप गोरेगाव, इस्माईल युसूफ बस स्टॉप शहराच्या दिशेने जोगेश्‍वरी, बालाजी गॅरेज वांद्रे 

प्रमुख अपघांताचे प्रमाण (2019) 
-वाहतुकीचा प्रकार - संख्या - टक्के 
-पादचारी --1442--50 
-दुचाकी - 967--34 
-रिक्षा -215--8 
-चार चाकी - 121---4 

नो एन्ट्री मधून वाहने चालवणे, ओव्हर स्पिडींग, दुचाकी स्वाराने हॅम्लेट न वापरणे यामुळे सर्वाधिक अपघात होत असल्याच आढळले आहे. त्यानुसार 2019 मध्ये झालेली कारवाई 
प्रकार -                                  प्रकरणे 
- नो एन्ट्री -                             3 लाख 98 हजार 749 
-हॅल्मेट विना -                         3 लाख 67 हजार 717 
-ओव्हर स्पिड -                       1 लाख 3 हजार 600 
-सिट बेल्ट न लावणे -                          29 हजार 687 

पालकांनो विचार करा! 
वाहन चालवण्याचे कायदेशीर वय 18 असले तरी त्यापेक्षा कमी वयाची शाळकरी मुलही अनेक वेळा वाहन चालवताना दिसतात. 2019 मध्ये अशा प्रकारच्या 3 हजार 65 मुलांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 15 लाख 32 हजार 500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. मुंबई खालोखाल पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीत 1 हजार 133 मुलांना वाहाने चालवताना पकडण्यात आले होते. 

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com