कोश्यारींच्या हवाई प्रवासाला सरकारने नाकारली परवानगी, विमानात बसलेले राज्यपाल राजभवनात परतले

कोश्यारींच्या हवाई प्रवासाला सरकारने नाकारली परवानगी, विमानात बसलेले राज्यपाल राजभवनात परतले

मुंबई : महाराष्ट्र राज्य विरुद्ध राज्यपाल या वादाचा नवा अंक समोर येताना पाहायला मिळतोय. याला कारण ठरतंय मुख्यमंत्री कार्यालयाने राज्यपालांच्या हवाई प्रवासाला नाकारलेली परवानगी. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंडकडे जात होते, यावेळी राज्यपाल सरकारी विमानाने उत्तराखंडकडे  निघाले होते. मात्र भगतसिंह कोश्यारी यांच्या शासकीय विमानास मुख्यमंत्री कार्यालयाकडून परवानगीच मिळाली नसल्याची बाब समोर आली.

 महत्त्वाची बाब म्हणजे राज्यपाल हे विमानात बसलेही होते. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून परवानगी मिळाली नाही म्हणून राज्यपालांना पुन्हा राजभवनात यावं लागलंय अशी देखील माहिती मिळतेय.

या घटनेनंतर आता महाराष्ट्र राज्य विरुद्ध राज्यपाल या वादाचा नवा अंक येत्या काळात पाहायला मिळू शकतो.

उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून मोठी नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी तिथे जात होते. उत्तराखंडमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर कोश्यारी यांनी खेद देखील व्यक्त केला होता. आज राज्यपाल उत्तराखंडसाठी प्रस्थान करत असताताना त्यांच्या हवाई प्रवासास मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून परवानगी मिळाली नसल्याचं समजल्यानंतर त्यांना पुन्हा राजभवनात परतावं लागलं. 

आधीच महाराष्ट्रात राज्यपाल नियुक्त १२ विधानपरिषद आमदारांच्या नेमणुकीवरून राज्य विरुद्ध राज्यपाल हा वाद चांगलाच चिघळला आहे. राज्यपालांनी विधानपरिषेदच्या 12 जागांबाबत आता अंत पाहू नये, असं विधान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात भाष्य केलं होतं. आज समोर येणाऱ्या घटनेनंतर आता भगतसिंह कोश्यारी विरुद्ध महाराष्ट्र राज्य सरकार हा वाद अधिक चिघळणार असं बोललं जातंय. 

राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरवात : 

या वादाबाबत आता राजकीय प्रतिक्रिया देखील येण्यास सुरवात झाली आहे. याबाबत आपल्याला काहीही माहिती नाही. राज्यपालांसारख्या मोठ्या व्यक्तीबाबत बोलताना आपल्याला माहिती नसताना यावर काही भाष्य करणं योग्य ठरणार नाही, असं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणालेत.

तर भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील या घटनेवर भाष्य केलं आहे. "राज्यपालांना सरकारकडून विमान नाकारलं गेलं असल्यास हे अत्यंत बदनामीकारक आहे. राज्य सरकारकडून असं झालं असेल तर राज्यपालांची सरकारने माफी मागून विषय इथेच संपवावा आणि ज्या अधिकाऱ्याकडून ही अक्षम्य चूक झाली असेल त्याला बडतर्फ करावं", असं सुधीर मुनगंटीवार म्हणालेत.

mumbai news bhagat sinh koshyaris uttrakhand visit maharashtra government denied air travel permission

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com