मुंबई - मनसेने कॉंग्रेसला हात दिल्यामुळेच मुंबईत सोमवारी बंदचा परिणाम दिसला. विरोधकांचा हा सर्वपक्षीय बंद असला, तरी मनसेची आक्रमकता कॉंग्रेसच्या पथ्यावर पडली. विरोधी पक्षांचा घटक म्हणून मनसे मुंबईतील बेधडक आंदोलनामुळे राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला. मनसेचा कॉंग्रेसच्या बंदमधील सक्रिय सहभाग हा नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव असल्याची चर्चा आता मुंबईत सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रभादेवीत सिद्धिविनायक मंदिरात कार्यक्रमासाठी आल्याचे समजताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना थेट काळे झेंडे दाखविले. मनसेने ठिकठिकाणी अनोख्या पद्धतीने आंदोलने केली. बंदची घोषणा झाल्यानंतर पक्षाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली जावी, या उद्देशानेच मनसेने आंदोलनाची तयारी केल्याचे समजते. चेंबूर येथील डायमंड पेट्रोल पंपावर एक गाढव आणून इंधन दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध केला. दादर येथे "अच्छे दिन' या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. घाटकोपर येथे "रेल रोको'चा केलेला प्रयत्न, गोरेगाव येथील आंदोलन, तसेच मुंबईच्या बहुतांश भागात यशस्वी झालेला बंद हा मनसेच्या आक्रमकतेमुळेच झाल्याचे दिसून आले. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आंदोलनेही झाली. मात्र, तुलनेत मनसेची आंदोलने दखलपात्र ठरल्याचे दिसून आले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांना सतत टीकेचे लक्ष्य करीत आहेत. कॉंग्रेसची सत्ता असताना ते तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर टीका करीत होते. भाजपच्या धोरणांवर टीका हा आता राज यांचा राजकीय अजेंडा असल्याचे दिसत आहे. हाच मनसेचा कॉंग्रेससोबतच्या जवळीकीचा मुद्दा असल्याचे बोलले जात आहे.
हिंसाचार करू नका, असे आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले होते. त्यामुळे मनसेने आज कोणताही हिंसाचार केला नसल्याचे दिसून आले.
बंद कोणी पुकारला, हे महत्त्वाचे नाही. सामान्यांना झळ पोचविणारा दरवाढीचा विषय सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे. आगामी राजकीय समीकरणांची ही नांदी आहे, असे आता म्हणता येणार नाही. पुढे जशी परिस्थिती निर्माण होईल, तसे निर्णय आम्ही घेऊ.
- बाळा नांदगावकर, नेते, मनसे
|