...नाहीतर राज्यात भूकंप येईल, यशोमती ठाकूर भाजपवर कडाडल्या

...नाहीतर राज्यात भूकंप येईल, यशोमती ठाकूर भाजपवर कडाडल्या

मुंबईः महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्ष आणि महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपाचे आमदार आमच्या संपर्कात असून त्यांची नावं कळली तर राज्यात भूकंप येईल, असं त्यांनी म्हटलंय. कर्नाटक, मध्यप्रदेशमध्ये सत्तापालट झाल्यानंतर राजस्थानमधील राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातही मोठी राजकीय घडामोड होईल अशी चर्चा रंगू लागल्यात. याच पार्श्वभूमीवर यशोमती ठाकूर यांनी भाजपला इशारा दिला आहे. 

राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थिर असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जर सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला तर तुमची गाठ थेट यशोमतीशी आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे. आमचे कोणी फुटणार नाहीत असंही त्यांनी म्हटलं आहे. यशोमती ठाकूर यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

कर्नाटक, मध्यप्रदेश आणि आता राजस्थानमध्ये भाजपने घाणेरडा खेळ आणि घाणेरडं  राजकारण सुरु ठेवलंच आहे. शेणातला किडा जसा शेणातच राहतो तसं यांचं झालं आहे. केंद्र सरकारमध्ये त्यांना एवढी मोठी सत्ता मिळाली. तरी त्यांचा हाव आता राज्यामध्ये आहे. राज्यातील सरकार पाडण्याचा प्रयत्न ते करत आहेत. मला सातत्याने महाराष्ट्रामध्ये काय असं विचारलं जातं. माझं सर्वांना सांगणं आहे राज्यातलं सरकार स्थिर आहे, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या. शरद पवार, सोनिया गांधी असल्याने राज्यातील सरकार स्थिर असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

महाराष्ट्राने नवा फॉर्म्युला देशासमोर ठेवला आहे. हा फॉर्म्युला खूप चांगला आहे. याशिवाय हा फॉर्म्युला दीर्घकाळ राहील. कुणी अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, कुणी पक्ष सोडण्याचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही चांगलंच बदडू. आम्ही गांधीवादी आहोत. पण भाजपची दादागिरी किती दिवस सहन करायची?, असा सवाल यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला. 

आम्ही तुकाराम महाराजांची शिकवण शिकलेलो आहोत. नाठाळांच्या डोक्यावर काठी कशी मारायची हे आम्हालाही कळतं. तुमची गाठ आमच्याशी आणि यशोमती ठाकूरशी आहे, हे लक्षात ठेवा, अशा शब्दात त्यांनी भाजपला इशारा दिलाय.

देवेंद्र फडणवीस विदर्भातील आहेत. मात्र, त्यांना सत्ता नसलेलं सहन होत नाही, अशी टीकाही यशोमती ठाकूर यांनी फडणवीसांवर केली. माजी मुख्यमंत्री ज्यांना घेऊन फिरत आहेत ते बाहेरुन आलेले लोक आहेत. खऱ्या अर्थाने त्यांचा पक्ष किती दुर्बळ झाला आहे हे दिसत आहे. त्यांच्या १०५ पैकी आमचे किती लोक तिकडे गेले आहेत आणि ते कधीही परत येतील, याबद्दल तुम्ही हमी देऊ शकत नाही. उलट १०५ पैकीच काही लोक आमच्या संपर्कात आहेत. त्यांची नावं कळली तर राज्यात भूकंप होईल, असा दावाही त्यांनी केलाय. 

भाजपला घोडेबाजाराची सवय आहे, त्यांना पैशाचा उन्मात आहे, अशा शब्दात भाजपवर टीका केली आहे. हे सर्व राजकीय संस्कृतीच्या विरोधात आहे. मात्र, महाराष्ट्रात राजस्थानसारखी परिस्थिती उद्भवणार नाही. राज्याला दिलदार मुख्यमंत्री मिळाला असल्याचं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. 

सध्या राजस्थानातील भाजपच्या ऑपरेशन लोटसमुळे सध्या देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. यावर आता महाराष्ट्रातील नेतेमंडळीही आपली प्रतिक्रिया देत आहेत.

bjp mla changed side and can come with us Congress leader Yashomati Thakur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com