मध्य वैतरणात बीएमसीचा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प; राज्यातील पहिलाच प्रयोग

मध्य वैतरणात बीएमसीचा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प; राज्यातील पहिलाच प्रयोग
मध्य वैतरणात बीएमसीचा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प; राज्यातील पहिलाच प्रयोग

मुंबई : राज्यातील पहिला तरंगता सौरऊर्जा प्रकल्प मुंबई महापालिकेच्या मध्य वैतरणा धरणावर उभारण्यात येणार आहे. सौरऊर्जा प्रकल्पाबरोबरच जलविद्युत प्रकल्पही उभारण्यात येणार आहे. दोन्ही प्रकल्पातून 100 मेगावॉट वीज निर्माण होणार असून, या विजेवर बेस्टच्या बस धावणार आहेत. तसेच पथदिव्यांसाठी ही वीज वापरण्याचा विचार आहे, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

मुंबई महापालिकेकडून मध्य वैतरणा धरणावर जलविद्युत प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न 10 वर्षांपासून सुरू आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात राज्य सरकारने पालिकेला या प्रकल्पासाठी परवानगी दिली होती. दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने धरणाच्या पाण्यावर तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी गेल्या वर्षी चार धरणांवर असा प्रकल्प उभारण्याचा विचार पुढे आला होता. त्यात मध्य वैतरणाचे नाव नव्हते; मात्र आता महापालिकेकडून जलविद्युत प्रकल्पाबरोबरच सौरऊर्जा प्रकल्पही उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. 17 डिसेंबरपर्यंत निविदा भरण्याची अंतिम तारीख आहे. खासगी सहभागातून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. ऊर्जानिर्मिती केंद्र अडीच वर्षात उभारून 25 वर्षे त्याची देखभाल करायची आहे. पालिकेने भांडुप आणि ठाणे जिल्ह्यातील जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये सौरऊर्जेमार्फत वीजनिर्मिती प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज त्या ठिकाणी वापरली जाते. मात्र मध्य वैतरणा धरणात निर्माण होणारी वीज मोठ्या प्रमाणात असल्याने ती ग्रीडच्या माध्यमातून मुंबईत आणण्यात येणार आहे. 

विजेवर पालिकेच्या बस धावणार 
सौरऊर्जेतून 80 मेगावॉट आणि जलविद्युत प्रकल्पातून 20 मेगावॉट वीज निर्मिती करण्यात येणार आहे. जलविद्युत प्रकल्पातून वर्षाला 65 दशलक्ष युनिट वीज निर्माण होण्याचा अंदाज आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज महावितरण कंपनीला देण्यात येणार आहे. या कंपनीचा प्रकल्प धरणापासून 40 किलोमीटर अंतरावर आहे. त्या मोबदल्यात मुंबईत वीज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही वीज पथदिव्यांसाठी वापरण्यात येईल. तसेच बेस्टच्या इलेक्‍ट्रिक बससाठीही तिचा वापर करण्याचा पालिकेचा विचार आहे. बेस्टमध्ये एक हजारपर्यंत इलेक्‍ट्रिक बसचा ताफा वाढविण्याचा महापालिकेचा विचार आहे. 

-----------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com