महाराष्ट्र सागरी मंडळाची बंदरांवरही लवकरच सेवा; अर्नाळ्यात पहिला प्रयोग
मुंबई - पर्यटकांना आकर्षित करण्याकरता महाराष्ट्र सागरी मंडळाने (एमएमबी) पुढाकार घेत राज्यातील चौपाट्यांवर वायफाय सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. विरार येथील अर्नाळा चौपाटीवर प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू केली जाईल. लवकरच त्याचे उद्घाटन केले जाणार आहे.
मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील किनारपट्टीचा विकास करण्याकरता सागरी मंडळाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. चौपाट्यांवरील अतिक्रमण हटवून त्या जमिनी ताब्यात घेण्यास मंडळाने सुरवात केली आहे. पर्यटकांची संख्या वाढून स्थानिकांना चौपाट्यांवर रोजगार मिळावा, याकरता खास उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. सूर्यास्त पाहायला चौपाट्यांवर येणाऱ्या पर्यटकांकरता खास बस तयार करण्यात आली आहे. राज्यातील चौपाट्यांवर इंटरनेट सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांशी चर्चा झाली. एका खासगी कंपनीने ही सेवा पुरवण्यास होकार दिला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अर्नाळा चौपाटीवर प्रायोगिक तत्त्वावर लवकरच ही सेवा सुरू होणार आहे. राज्यातला हा पहिलाच प्रयोग असेल. वायफायमुळे मोठ्या संख्येने पर्यटक चौपाट्यांवर आकर्षित होतील, यातून "एमएमबी'चा महसूलही वाढेल, असा विश्वास अधिकाऱ्यांना आहे. काही ठिकाणी बंदरांवरही ही सेवा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. फेरीबोटीचे नेटवर्क बंदरांवरील वायफायने जोडले जाणार आहे. एसटीप्रमाणेच बोटींवरही वायफाय सुरू करण्याचा "एमएमबी'चा विचार आहे.
राज्यात "कोस्टल कम्युनिकेशन नेटवर्क' सुरू करण्यात येणार आहे. चौपाट्यांवर येणाऱ्या पर्यटकांकरता वायफाय आणि हॉटस्पॉट सुविधा सुरू केली जाईल. प्रायोगिक तत्त्वावर अर्नाळा चौपाटीवर ही सुविधा सुरू होईल. टप्प्याटप्प्याने सर्वच चौपाट्यांवर वायफाय सुविधा सुरू केली जाईल.
- अतुल पाटणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ
|