त्या वक्तव्याने ठाणे जिल्ह्याचे पालकत्व चव्हाणांनी गमावले ?

राजकीय गोटात चर्चा, भाजपमध्ये नाराजी
BJP MLA Ravindra Chavan
BJP MLA Ravindra ChavanSAKAL

डोंबिवली : कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांवरुन कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला. मंत्री चव्हाण यांच्या डोंबिवलीतील त्या वक्तव्यानंतर शिंदे गट नाराज झाला आहे. डोंबिवलीतील शिंदे गटासह ठाकरे गटाने देखील चव्हाण यांच्यावर रस्ते कामावरुन टिकेची झोड उठविली होती. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून चव्हाण यांच्या नावाची चर्चा असतानाच शंभूराजे देसाई यांच्या नावाची घोषणा झाल्याने भाजप गटात नाराजीचे वातावरण आहे. शिंदे गटाची ही नाराजी चव्हाण यांना भोवली असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांच्या कामावरुन कल्याण डोंबिवलीत सध्या भाजप व शिंदे गटात शीत युद्ध सुरु आहे. डोंबिवलीतील एका कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री चव्हाण यांनी रस्त्यांच्या कामाचा रद्द केलेला निधी मंजुर करत केलेले पाप धुवून काढावे असे वक्तव्य केले होते. त्यावरुन शिंदे गटाने नंतर मंत्री चव्हाण यांना 13 वर्षात विकास कामे रखडवून जे पाप चव्हाण यांनी केले ते पाप झाकण्याचा प्रयत्न करीत असल्याची टिका केली. शिंदे गटाला अप्रत्यक्ष रित्या ठाकरे गटाचा देखील पाठींबा मिळाल्याचे या दिवसांत पहायला मिळाले. ठाकरे गटाने मंत्री चव्हाण यांच्यावर टिका करत आता तरी कल्याण डोंबिवलीकडे लक्ष द्यावी अशी सूचना केली. त्यानंतर मनसेने मंत्री चव्हाण यांचे अभिनंदन करत त्यांना पाठिंबा देऊ केला. यावरुन मनसे व शिंदे गटात ट्विटर वॉर रंगल्याचे पहायला मिळाले आहे.

शहरात या घडामोडी सुरु असतानाच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नुकतीच शंभुूराजे देसाई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. देसाई हे सातारा जिल्ह्यातील आहेत. 26 जानेवारीला ठाणे जिल्ह्याच्या ध्वजवंदनाचा मान चव्हाण यांना दिला गेला होता. त्यानंतर कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिले जाईल अशी चर्चा होत असल्याने भाजप पदाधिकाऱ्यांत आनंदाचे वातावरण होते. त्यात चव्हाण यांना पालघर व सिंधूदुर्ग जिल्ह्याचे पालकत्व दिले आहे. तर ठाण्याचे पालकत्व देसाई यांच्या खांद्यावर देण्यात आले आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. कॅबिनेट मंत्री चव्हाण यांनी केलेले ते वक्तव्य शिंदे गटाच्या जिव्हारी लागले असून यामुळेच ठाणे जिल्ह्याचे पालकत्व चव्हाण यांनी गमावले आहे का ? याविषयी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

भाजपच्या माजी नगरसेवकाची नाराजी

मिस्टर गुवाहाटी...काही तरी सोडा आमच्यासाठी

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून शंभूराजे देसाई यांची घोषणा झाली. याचवरून भाजपचे माजी नगरसेवक व चव्हाण यांचे नीकटवर्तीय मंदार टावरे यांनी फेसबुकवर पोस्ट करत मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांना मिस्टर गुवाहाटी म्हणत काही तरी सोडा इथल्या भूमिपुत्रांच्या हाती. नाहीतर परत लढावं लागेल आमच्या अस्मितेसाठी अशी फेसबुक पोस्ट केली आहे. ठाणे जिल्ह्यातील कामासाठी आम्ही साताऱ्याला जायचे का ? असा सवाल करीत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे येथील मतदार संघातूनच द्यायला हवे होते. येथील भूमीपूत्र किंवा याच मतदार संघातील मंत्री, आमदार यांना मंत्रीपद द्यायला हवे. आम्हाला साताऱ्याला जायला लावू नका ही आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com