मुंबई : सांगली जिल्ह्यात एकूण 10 तालुक्यांपैकी 5 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी तात्पुरत्या व तातडीच्या उपाय योजना राबविण्यावर प्रशासनाने भर द्यावा. सध्या सांगलीत एकूण 4 चारा छावण्या सुरु असल्या तरी जनावरांची संख्या लक्षात घेऊन वाढीव चारा छावण्या सुरु कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज ऑडिओ ब्रिजच्या प्रणालीद्वारे सांगली जिल्ह्यातील प्रामुख्याने जत, तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर -विटा या दुष्काळी तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक आणि जिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी यांच्याशी संवाद साधला. सरपंचांनी केलेल्या चारा छावण्या, टँकर, नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती आदी बाबींच्या तक्रारींची तसेच जिल्ह्यासाठी देण्यात आलेल्या व्हॉटसअॅपवर येणाऱ्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन कार्यवाही करावी व त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाला यावेळी दिले. सांगली जिल्ह्यातील जनावरांची संख्या लक्षात घेता चारा छावण्या सुरु कराव्यात तसेच ज्या तालुक्यांमध्ये पाण्याच्या गरजेनुसार तेथे टँकर सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रशासनास दिले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी सध्याची स्थिती पाहून चारा छावणी, टँकर पुरवठा, तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती आदी तातडीच्या उपायांवर भर द्यावा. त्याचबरोबर ज्या गावांमध्ये नळ पाणी पुरवठा योजना नाहीत, अशा ठिकाणी या योजना सुरू करण्यासंदर्भातील अहवाल तयार करावे. टँकरची मागणी असल्यास पाहणी करून तहसीलदारांनी तत्काळ प्रस्ताव मंजूर करावेत. जनावरांसाठीही टँकरद्वारे पाणी पुरविण्यात यावे. सिंचन विहिरी अथवा तलावामधील पाण्याच्या स्त्रोताचा वापर करण्यासंदर्भात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभागाचे अहवाल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर कार्यवाही करावी.
तालुका | टँकर्सची संख्या |
जत | 107 |
आटपाडी | 34 |
कवठेमहांकाळ | 13 |
तासगाव | 12 |
खानापूर -विटा | 12 |
मिरज | 6 |
सांगली एकूण टँकर्स | 183 |
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यात 357 कामे सुरु असून त्यावर 2 हजार 666 मजूर उपस्थित आहेत. जिल्ह्यामध्ये 10 हजार 150 कामे शेल्फवर आहेत.
पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणासाठी जिल्ह्यात आजअखेर 16 विंधन विहिरी, 96 विहिरींचे अधिग्रहण करुन पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यात येत आहे. थकित विद्युत देयकामुळे बंद पडलेल्या नळ पाणी पुरवठा योजना सुरळीत करण्यासाठी 3.88 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून या योजनांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
दुष्काळ आढावा बैठकीस मुख्य सचिव अजोय मेहता, पाणी पुरवठा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्यामलाल गोयल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव अनुपकुमार, जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.