मुंबईत आतापर्यंत १५ टक्के नालेसफाई

पूरस्थितीला पालिकाच जबाबदार : विरोधक
नालेसफाई
नालेसफाईsakal

मुंबई: दिवस वेगाने सरत आहेत, पावसाळाही अगदी दीड महिन्यावर आहे. त्या तुलनेत मुंबईमधील नालेसफाई मात्र संथगतीने सुरू आहे. मुंबईत आतापार्यंत केवळ १५ टक्केच नालेसफाई झाल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. नालेसफाईचा वेग असाच राहिला तर पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण होणे अवघड आहे. अशा परिस्थितीत मुंबईची ‘तुंबई’ होण्याची शक्यताच अधिक असल्याची भीती विरोधकांकडून व्यक्त होत आहे.

पावसाळ्याच्या पाच महिने आधीच मुंबईतील नालेसफाईला सुरुवात होत असते. दरवर्षी जानेवारी महिन्यात नालेसफाईची कामे हाती घेतली जातात. त्यामुळे एप्रिल महिन्यापर्यंत ७५ टक्के नालेसफाईची कामे पूर्ण झालेली असतात. यावेळी मात्र नालेसफाईला उशिरा सुरुवात झाली. महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने पालिकेवर प्रशासक नेमण्यात आला. यानंतर नालेसफाईच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. त्यामुळे प्रत्यक्ष नालेसफाईच्या कामाला उशिरा सुरुवात झाली.

अशा परिस्थितीत जोरात पाऊस झाला तर पाणी साचून पूरपरिस्थिती उद्‍भवण्याची भीती आहे. असे झाले तर यासाठी पालिका प्रशासन जबाबदार असेल, असे पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितले. दरवर्षी नालेसफाईवर नगरसेवकांचे लक्ष असत. यावेळी नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने प्रशासनावर कुणाचाही अंकुश नाही. नालेसफाई वेळेत पूर्ण होण्यासाठी दोन शिफ्टमध्ये नालेसफाई करणार, असे पालिका आयुक्तांनी म्हटले होते. मात्र दुसऱ्या पाळीतील काम होतांना दिसत नाही. सध्या पालिका प्रशासनाला काय दावा करायचा तो करूद्या, आम्ही १ जूनला कामाची पाहणी करून काय ते उत्तर देऊ, असे ही रवी राजा यांनी म्हटले आहे.

नालेसफाई नव्हे ‘हात की सफाई’!

पालिका प्रशासन काहीही दावा करत असले तरी मुंबईतील नालेसफाई म्हणजे ‘हात की सफाई’ असल्याची टीका भाजपचे माजी गट नेते प्रभाकर शिंदे यांनी सांगितले. आतापार्यंत १० टक्के देखील नालेसफाई झालेली नाही. त्यामुळे यंदा पावसाळ्यात मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागू शकतो. आमचे नालेसफाईच्या कामावर बारीक लक्ष असून वेळेत पोलखोल करणार असल्याचे ही शिंदे म्हणाले.

३४० किमीचे नाले

मुंबईत साधारणतः ३४० किलोमीटर लांबीच्या छोट्या-मोठ्या नाल्यांची सफाई केली जाणार आहे. यासाठी दोन पाळ्यांमध्ये काम करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. यातून साधारण दोन लाख ५२ हजार ६१० मेट्रिक टन गाळ काढण्यात येणार आहे. मात्र आतापर्यंत जर १५ टक्के नालेसफाई झाली असेल तर केवळ ५० हजार मेट्रिक टन गाळ बाहेर काढण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com