राज्याच्या संकटात आणखी भर! कोरोनानंतर ‘कांगो फिवर'? उपचार, निदानाअभावी 30 टक्क्यांपर्यत मृत्यूची शक्यता

राज्याच्या संकटात आणखी भर! कोरोनानंतर ‘कांगो फिवर'? उपचार, निदानाअभावी 30 टक्क्यांपर्यत मृत्यूची शक्यता


मुंबई : जनावरांमधील ‘कांगो फिवर’ रोगाचा माणसांनाही धोका असल्याचे समोर आले आहे. उपचार आणि निदानाअभावी 30 टक्क्यापर्यंत मृत्यू होण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर पशुसंवर्धन विभागाच्या पश्‍चिम विभागीय रोगनिदान प्रयोगशाळेने राज्यातील सर्व पशुसंवर्धन विभाग कार्यालयांना  सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. गोचिडांमुळे क्रायमिन काँगो हेमोरेजिक फिव्हर (CCHF) या साथीच्या रोगाची लागण होण्याची शक्यता असल्याने राज्याच्या सीमा भागातील पशुपालक व मांस विक्रेत्यांनी  सतर्क राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरुसल यांनी केले आहे 

कोरोना संकटाचा तडाखा सुरू असतानाच 'क्रिमीयन कांगो हॅमोरेजीक फिवर’(सीसीएचएफ) हे आणखी एक संकट डोक्यावर घोंघावत आहे. ‘कांगो फिवर’ म्हणूनही ओळखल्या जाणा-या या आजाराने जनावरे बेजार आहेत. गुजरातमधील बोताड आणि कच्छ  जिल्ह्यांत त्याचा   जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग आढळला आहे. हा आजार गुजरात मधून महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या जिल्ह्यात पसरण्याची शक्यता असल्याने पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयामार्फत याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले आहे . गुजरात - महाराष्ट्राच्या सीमा जोडलेल्या असल्याने अधिक काळजी घेण्याचे निर्देश पशुसंवर्धन विभागाने दिले आहेत.

जनावरांपासून मानवाला ‘कांगो फिवर’चा प्रादुर्भाव होउ शकतो. उपचार व निदानाअभावी संसर्ग झालेल्या व्यक्तींपैकी 30 टक्क्यापर्यंत मृत्यू होण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या पश्‍चिम विभागीय रोगनिदान प्रयोगशाळेने ‘अलर्ट’ राहण्याचे निर्देश सर्व जिल्ह्यांना दिले आहेत.
आजार ‘झुनोटीक’ ‘कांगो फिवर’ हा झुनोटीक स्वरूपाचा म्हणजेच जनावरांपासून मानवाला होणारा रोग आहे. याचा प्रादुर्भाव यापूर्वी कोंगो, दक्षिण अफ्रीका, चीन, हंगेरी, इराण या देशात झाल्याचा इतिहास आहे.  ‘नॅरो व्हायरस’ विषाणूमुळे होत असून, हा विषाणू मुख्येत्वकरून हायलोम्मा या जातीच्या गोचिडाद्वारे एका जनावरांपासून दुस-या जनावराला व बाधित जनावरांपासून मानवांमध्ये संक्रमीत होतो. 
या रोगाची गाई, म्हशी, शेळ्या मेंढ्या या पाळीव जनावरांसह शहामृग पक्ष्यामध्ये  कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. अशीच बाधित जनावरे, पक्षी या विषाणूंचे वाहक म्हणून कार्यरत राहतात. अशा वाहक जनावरांच्या संपर्कात आलेल्या जनावरांचे मालक, संपर्कातील व्यक्ती, खाटीक, पशुचिकीत्सक, कर्मचारी इत्यादींना या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. 

मानवामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव अत्यंत घातक असल्याचे दिसून आले आहे. बाधित व्यक्तींपैकी 30 टक्क्यांपर्यंत व्यक्ती त्वरीत निदान व उपचार न झाल्यास मृत्यू पावण्याची शक्यता असते.  या विषाणूजन्य रोगाविरुद्घ प्रभावी व हमखास उपयुक्त असे उपचार उपलब्ध नाहीत. त्यामुळे बाह्य किटकांचे उच्चाटन, प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.  

अशी आहेत लक्षणे
बाधित झालेल्या व्यक्तींमध्ये सुरुवातीला डोकेदुखी, जास्त ताप येणे, सांधेदुखी, पोटदुखी, उलटी आदी लक्षणे दिसून येतात. आजारी व्यक्तींचे डोळे लाल दिसतात. घशात तसेच तोंडातील वरच्या भागात लाल ठिपके दिसतात. आजार बळावल्यास त्वचेखालील रक्तस्त्राव, नाकातून रक्तस्त्राव, लघवीतून रक्तस्त्राव अशी विविध लक्षणे दिसून येतात. काही रुग्णांत काविळसारखी लक्षणे दिसतात.

अशी घ्या दक्षता  
पशुंचे मास चांगल्याप्रकारे शिजवून खावे, आजारी जनावरांवर उपचार करताना वापरण्यात येणा-या सामुग्रीचे निर्जुंतुकीरण करून विल्हेवाट लावावी. पशुवैद्यकांनी हॅण्डग्लोव्हज, मास्क, संरक्षक चष्मा आदीचा वापर करावा. बाजारात विविध ठिकाणाहून जनावरे येतात. व्यावसायिकांना योग्यप्रकारे मार्गदर्शन करण्यात यावे,  जनावरांची तपासणी करावी, अंगावर गोचिड आढळल्यास त्यांना कळपापासून वेगळे करावे, त्यांच्यावर ताबडतोब प्रतिबंधक औषधाची फवारणी करावी, अशाप्रकारे दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आंतरराज्य सीमेवर तपासणी
गुजरातमधून गीर गाय, मेहसाना, जाफ्राबादी म्हशी तसेच शेळ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात येतात. गुजरात राज्यात हा रोग नियंत्रणात येत नाही तोपर्यंत खरेदी विक्रीचे व्यवहार टाळावे. आंतरराज्य सीमा रेषेवरील तपासी नाक्यांमध्ये राज्यात येणार्‍या पशुधनाची तपासणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

या आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व रोगाचा प्रसार रोखण्यासाठी गोचिड निर्मूलनाचा कार्यक्रम प्राधान्याने घेण्यात येईल. सर्व ती आवश्यक  खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने पशुपालकांना करण्यात येत आहे.

डॉ.माणिक गुरसळ,
जिल्हाधिकारी पालघर

 

सध्या तरी ‘कांगो फिवर’चा प्रादुर्भाव महाराष्ट्रात जाणवला नसला तरी मुंबईत खबरदारी घेतली जात आहे. देवनार पशुवधगृहात येणा-या जनावरांची आरोग्य तपासणी प्रमाणपत्रा शिवाय आत प्रवेश दिला जात नाही. या  पशुवधगृहात प्रत्येक जनावरांची पुन्हा आरोग्य तपासणी करण्यात येते. त्यामुळे घाबरण्याचे काहीही कारण नाही.
-डॉ योगेश शेट्टे,
संचालक, देवनार पशुवधगृह

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com