मुंबई : राज्यात मराठा समाज रस्त्यावर उतरून आरक्षणासाठी संतप्त झाला असताना आता राजकीय पक्षांच्या व्यासपीठावरही हा रोष समोर येऊ लागला आहे. मराठा आरक्षण, तसेच आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा दबाव म्हणून सर्व काँग्रेस आमदारांनी सामूहिक राजीनामा देण्याचा आग्रह सोमवारच्या बैठकीत धरला. आरक्षणाबाबतीत पक्षाची भूमिका समाजासोबत असायला हवी. सरकार आंदोलनाला अद्याप गंभीरपणे घेत नसल्याने संताप वाढत आहे. पाच मराठा आंदोलकांनी आत्महत्या केली आहे, त्यामुळे काँग्रेसच्या सर्व आमदारांना राजीनामा देण्यास परवानगी द्या, अशी मागणीच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार भारत भालके व अब्दुल सत्तार यांनी बैठकीत केली; मात्र सरकार एक दिवसाचे अधिवेशन घेणार आहे, त्या वेळी आमदारांची भूमिका महत्त्वाची असल्याचे काहींचे मत होते.
निर्णय झालेला नाही : चव्हाण
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आमदारांच्या राजीनाम्याबाबत बोलताना सांगितले, की आमदारांच्या भावना तीव्र आहेत; मात्र सर्व आमदारांनी राजीनामा द्यावा, असा कोणताही निर्णय झालेला नाही. याबाबत मतभेद आहेत. विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या कायद्यासाठी सभागृहात सरकारला भाग पाडले पाहिजे, जाब विचारला पाहिजे, अशी पक्षाची भूमिका आहे, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.