कोरोनामुळे कर्करोगासारखे आजार बळावले; आरोग्याकडे दुर्लक्ष न करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला 

कोरोनामुळे कर्करोगासारखे आजार बळावले; आरोग्याकडे दुर्लक्ष न करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला 

मुंबई : कोरोनामुळे कर्करोगाशी संबंधित 69 टक्के; तर इतर आजारांतील 45 टक्के शस्त्रक्रियांना विलंब झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कर्करोग, ट्युमरसारखे आजार अधिक बळावले आहेत. उपचारासह शस्त्रक्रियेस विलंब झाल्यास रुग्णाच्या जीवावरही बेतू शकते, असा इशारा देत दुर्लक्ष न करण्याचा सल्लाही डॉक्‍टरांनी दिला आहे. 

गंभीर आजारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नानावटी रुग्णालयाने काही रुग्णांचा अभ्यास केला. गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारांच्या एकूण परिस्थितीचा त्यात अभ्यास केला असता त्यात हे वास्तव समोर आले आहे. कोरोनामुळे रुग्णांची तपासणी, उपचार आणि काळजी यामध्ये विलंब झाल्याने कर्करोगाशी संबंधित तक्रारी वाढल्याचे निष्पन्न झाले. यासाठी नानावटी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाने आपल्या आयकॉनिक कर्करोग केंद्राला बळकटी देऊन कर्करोगाच्या रुग्णांसाठी रोगनिवारण आणि प्रतिबंध करण्यासाठी अचूक निदान उपचार सुरू केले आहेत. 
याबाबत सर्जिकल ऑन्कॉलजिस्टचे वरिष्ठ सल्लागार डॉ. सुदीप सरकार म्हणाले, कोरोनाकाळात अनेक रुग्णांचे तब्येतीकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे कर्करोगाच्या घटनांत संभाव्य वाढ झाल्याचे दिसते. त्यामुळे रुग्णांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. 

दुसऱ्या टप्प्यातील रुग्ण बरा होतो; पण... 
कन्सल्टंट ऑन्लिजिस्ट डॉ. शिवम शिंगला म्हणाले, जानेवारीमध्ये एक 50 वर्षीय रुग्ण ओटी पोटदुखीच्या त्रासाच्या उपचारासाठी आला होता. तपासणीत त्याला रक्ताचा कर्करोग असल्याचे निदान झाले; मात्र त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाल्याने त्या रुग्णाने पुढील उपचारांकडे दुर्लक्ष केले; मात्र त्यानंतर जेव्हा तो रुग्ण उपचारासाठी आला त्या वेळी त्याला कावीळ, अशक्तपणा तसेच शरीराला सूज आली होती. कर्करोग त्याच्या संपूर्ण शरीरात पसरला होता. त्याला परदेशात उपचार घेण्याशिवाय पर्याय नव्हता; मात्र पुढील दोन दिवसांत त्या रुग्णाचा मृत्यू झाला. दुसऱ्या स्तरावरील कर्करोग उपचाराने बरा केला जाऊ शकतो; पण चौथ्या स्तरावरील कर्करोगावर उपचार करणे शक्‍य नाहीत. 


जून 2019 मध्ये जयपूरमधील एक 15 वर्षांचा मुलगा उपचारासाठी आला होता. त्याला बुर्किट लिम्फोमाचा त्रास असल्याचे निदान झाले. त्याच्या उपचार सुरू होते; मात्र त्याची दहावीची परीक्षा असल्याने तो परीक्षेसाठी आपल्या गावी निघून गेला. परीक्षा संपल्यानंतर जेव्हा त्याचा वैद्यकीय अहवाल तपासला गेला तेव्हा त्याला ट्युमर झाल्याचे निष्पन्न झाले. यामुळे व्यक्ती अशक्त होऊन त्यातील रोगप्रतिकारशक्ती खालावण्याचा धोका असून, वेळेत उपचार न केल्यास हा आजार प्राणघातकही ठरू शकतो. 
- डॉ. सुरेश अडवाणी,
ऑन्कॉलॉजिस्ट कन्सल्टंट 

कर्करोग किंवा ब्रेन ट्युमरसारख्या आजारांवर खूप कमी ठिकाणी यशस्वी उपचार केले जातात. यामुळे आम्ही अत्याधुनिक कर्करोग काळजी केंद्र सुरू केले आहे. लॉकडाऊनमुळे कर्करोगासारखे आजार बळावल्याने रुग्ण वाढले आहेत. हे लक्षात घेऊन आम्ही तज्ज्ञ डॉक्‍टरांची टीम तैनात ठेवली आहे. त्या माध्यमातून कर्करोगासारख्या आजारांशी लढा सुरू केला आहे. रुग्णांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. 
- डॉ. वंदना पाकळे,
संचालिका, नानावटी रुग्णालय 

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com