हिवाळ्यात कोरोना रौद्ररुप घेणार; जागतिक आरोग्य संघटनेचा गंभीर इशारा

हिवाळ्यात कोरोना रौद्ररुप घेणार; जागतिक आरोग्य संघटनेचा गंभीर इशारा


मुंबई - हिवाळ्यात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्युचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये हिवाळयात कोरोना विषाणूचा कहर आणखी वाढणार असल्याचे सांगत त्यांनी सावध केले आहे. कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असल्याचे वाटत असतांनाच जागतिक आरोग्य संघटनेच्या इशा-यामुळे चिंता पुन्हा वाढली आहे.  

हिवाळ्यामध्ये तरुणांना संसर्ग होण्याचं प्रमाण वाढेल आणि त्यामुळे अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागेल. मृत्यूचे प्रमाण देखील वाढेल असे  जागतिक आरोग्य संघटनेचे प्रादेशिक संचालक हेनरी क्लग यांनी सांगितले. यामुळे येणाऱ्या हिवाळ्यातील ३ मुख्य कारणांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला ही हेनरी क्लग यांनी दिला आहे. यामध्ये शाळा पुन्हा सुरु करणे, थंडीचा हंगाम आणि हिवाळ्यातील वृद्धांचा अधिक मृत्यू या कारणांमुळे संसर्गाचा धोका अधिक वाढू शकतो असे ही ते म्हणाले. 

हिवाळ्यात ही परिस्थिती ओढावणार असल्याने इतर देशांनी त्याला रोखण्यासाठी आताच तयारी करायला हवी व त्यानुसार सावधगिरी बाळगायला हवी असे ही हेनरी क्लग म्हणाले. सध्या पावसाळी वातावरण आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचते. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता अधिक असते. परंतु सध्या संपूर्ण जग कोरोना या विषाणूविरुद्ध लढत आहे. त्यात जागतिक आरोग्य संघटनेने धक्कादायक इशारा प्रत्येक देशाला दिला आहे.

पावसाळा तसेच हिवाळ्यातील वातावरण हे संसर्गासाठी अनुकूल असते. त्यामुळे कोरोना संक्रमणाचा आकडा पुन्हा वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे सध्या सर्व देशांनी हाय अलर्ट असणे आवश्यक आहे. प्रत्येक देशांनी योग्य रीतीने पावले उचलली पाहिजेत. प्रत्येकाने वेगवान चाचणी प्रणाली तयार केली पाहिजे. कोरोना विषाणूच्या संक्रमणावर मात केली आहे , असे ज्या देशांना वाटते अशा देशांनाही हा इशारा देण्यात आला आहे. 

कोरोनावरील प्रतिबंधित लस अद्याप आलेली नाही त्यामुळे कोरोना विषाणू पुन्हा येऊ शकतो. असे झाले तर जगभरात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते. हिवाळ्यात ही प्राणघातक लाट येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक देशाच्या प्रशासनाने आपल्या देशातील नागरिकांसाठी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे असे जागतिक आरोग्य  संघटनेच्या संसर्गजन्य रोगाच्या तज्ज्ञ मारिया केरखोव्ह यांनी सांगितले.

सध्या आपण अनलॉक 4 च्या दिशेने असून पुढील महिन्यात लादलेले निर्बंध अधिक शिथील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे महत्वाचे आहे. सामाजिक अंतराचे पालन करणे, मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतराचे भान राखणे, मुख्यतः गर्दी होणार नाही याची दक्षता घेणे, सरकारच्या नियमांचे पालन करणे या सर्व बाबी लक्षात ठेवल्या पाहिजेत. कोरोना विषाणूंवर प्रभावी अशी लस तयार करण्याचे प्रयत्न अनेक देशांतील संशोधक करत आहेत. लोकांनी सरकारच्या नियमांचे पालन करून स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com