"कोराना"बाबत अकलेचे तारे! म्हणे नित्य नियमाने "अग्निहोत्र" करा ! 

"कोराना"बाबत अकलेचे तारे! म्हणे नित्य नियमाने "अग्निहोत्र" करा ! 

मुंबई : कोरोना संसर्गामुळे अवघे जग हादरून गेले असतांना हिंदू जनजागृती समितीने मात्र अजब दावा केला आहे. कोरोना व्हायरसच्या संकटावर ''अग्निहोत्र" हा रामबाण उपाय असल्याचे सांगत. देशात 'करोना'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सूर्यादय आणि सूर्यास्त समयी 'अग्निहोत्र' करावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे. भारतीय वैदक संघटनेने मात्र हा दावा अशास्त्रीय असल्याचे सांगत लोकांची डिशभुल करण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले आहे.

कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी उपाययोजना सुचवण्यारे अनेक संदेश समाज माध्यमांवर 'व्हायरल' झाले आहेत. मंत्रोच्चारापासून ते अगदी लसूण, कांदा, गोमूत्र प्राशन करण्यापर्यंतचे उपचार त्यात सुचवण्यात आले आहेत. त्यात आता हिंदू जनजागृती समितीने केलेल्या दाव्याची भर पडली आहे. भारतीय संस्कृतीतील यज्ञयागांचे आध्यात्मिक लाभांसह वैज्ञानिक स्तरावर ही अनेक लाभ होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. अग्निहोत्र नियमित केल्याने वातावरणाची मोठ्या प्रमाणात शुद्धी होते. इतकेच नव्हे तर, ते करणाऱ्या व्यक्तीची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धीही होते. यासह वास्तू अन्‌ पर्यावरण यांचेही रक्षण होते. अग्निहोत्रामुळे निर्माण होणाऱ्या औषधीयुक्त वातावरणामुळे रोगकारक जंतूंच्या वाढीस प्रतिबंध होतो, तसेच त्यांचे अस्तित्व नष्ट होण्यास साहाय्य होते. त्यामुळेच सध्याच्या घडीला जगभरात थैमान घातलेल्या 'कोरोना व्हायरस'च्या संकटावर 'अग्निहोत्र' हा रामबाण उपाय ठरू शकतो असे सांगत सूर्यादय आणि सूर्यास्त समयी 'अग्निहोत्र' करावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केले आहे. यासह 12 मार्च रोजी असणारा 'विश्व अग्निहोत्र दिन' साजरा करण्याचे आवाहन ही त्यांनी केले आहे. 

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मात्र हिंदू जनजागृती समितीचा हा दावा खोडून काढला आहे. कोरोना संसर्ग होम-हवन करून रोखता येतो हा दावा म्हणजे थोतांड असल्याचे संस्थापक श्‍याम मानव यांनी सांगितले आहे. जगाला नव्याने समजलेल्या जंतूंवरील इलाज प्रणाली वैदिक काळात असणे शक्‍य नाही. हिंदू जनजागृती समितीचे हे 'स्युडो सायन्स' असून या माध्यमातून आपला धार्मिक अजेंडा राबवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप ही मानव यांनी केला आहे. होम-हवन करून कोरोना संसर्गापासून बचाव होतो याला कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचे सांगत लोकांनी डॉक्‍टरांच्या सल्ल्याने आपली काळजी घ्यावी असे ही ते म्हणाले. 
------------------------------- 
रामदास आठवले 'ट्रोल' 

ऑन द स्पॉट कविता करण्यासाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आपल्या कोरोना वरील कवितेमुळे चांगलेच ट्रोल झाले आहेत."गो कोरोना,गो कोरोना" ही कोरोनासंदर्भातील त्यांची घोषणा सध्या व्हायरल झाली आहे. याचा एक व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या संख्येने पाहिला जात आहे. मात्र त्यांच्या या घोषणेमुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. कोरोना सारखा विषाणू केवळ घोषणा करून माघारी जाणार आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात आला आहे. 

हिंदू जनजागृती सह इतर धार्मिक संघटना अश्‍या पोस्टच्या माध्यमातुन आपला अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करीत आहेत. समाज माध्यमांवरील कोणत्याही अशास्त्रीय संदेशांवर लोकांनी विश्वास ठेवू नये. 

श्‍याम मानव , संस्थापक , अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती 
------------------------------ 
कोरोना हा अलीकडे माहिती पडलेला विषाणू आहे. त्यावर वैदिक काळात उपचार पद्धती अस्तित्वात असणे शक्‍य नाही. या दाव्याला शास्त्रीय आधार नाही. चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवल्यास आजार बळावण्याची शक्‍यता आहे. 

डॉ. अविनाश भोंडवे , अध्यक्ष , इंडियन मेडिकल असोसिएशन 

covid19: and they said do angnihotra daily 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com