कल्याण लोकसभेत गुन्हेगारी वाढली!

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देताना खासदार श्रीकांत शिंदे.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देताना खासदार श्रीकांत शिंदे.

कल्याण : कल्याण लोकसभा मतदार संघातील कळवा, डोंबिवली, उल्हासनगर परिसरात गुन्हेगारीचा आलेख वाढला आहे. खून, चोरी, दरोडे, विनयभंग, महिला अत्याचार आदी गुन्ह्यांची वाढती आकडेवारी पाहता येथील कायदा व सुव्यवस्था बिघडत आहे. याच पार्श्‍वभूमीवर वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

कल्याण लोकसभा मतदार संघात अनधिकृत बारची संख्या प्रचंड असून तेथे मुलींच्या शरीर विक्रीसाठी छुप्या खोल्याही तयार केल्या जातात. डोंबिवली शहरातील शेलार चौक येथे तीन दिवसांपूर्वी क्षुल्लक वादावरून एका दुचाकीस्वाराची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. येथून हाकेच्या अंतरावर टिळकनगर पोलिस चौकी आहे व शेजारीच छोटी पोलिस चौकी असूनही सदर चौकीत एकही पोलिस कर्मचारी त्या वेळी उपस्थित नसल्याचे खासदार शिंदे यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या निदर्शनास आणून देत सदर गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. 

गेल्या महिन्यात कळवा शहरात लूटमारीसाठी आलेल्या चोरट्यांनी मेडिकलमध्ये काम करत असलेल्या एका युवकावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली होती. अशाप्रकारे गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांचा वचकदेखील राहिलेला नसल्याचे खासदार शिंदे यांनी म्हटले आहे. याच पार्श्‍वभूमीवर खासदार शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत निवेदन दिले. गुन्हेगारांवर त्वरित कठोर कार्यवाही करावी आणि सर्व रहदारीच्या भागांमध्ये पोलिसांची गस्त वाढवण्यात यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली आहे. 

उल्हास, वालधुनी नदीसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करा! 
डोंबिवलीमधील वाढते प्रदूषण कमी करा आणि मुंबईतील मिठा नदीच्या धरतीवर उल्हास व वालधुनी नदीच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र समिती प्राधिकरण स्थापन करण्यात यावे, अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे. प्रदूषण विषयावर खासदार शिंदे यांनी बुधवारी (ता. 22) आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन समस्या मांडली.

वालधुनी नदीच्या प्रदूषणामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे या परिसरातून वाहणारी उल्हास नदीही प्रदूषणाने वेढली आहे. उल्हास व वालधुनी नदीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी; तसेच पिकांसाठीही केला जातो. या दोन्ही नद्यांसाठी प्राधिकरण करून स्वतंत्र समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. त्यावर सदर ठिकाणी प्रत्यक्ष येऊन पाहणी करणार असल्याची ग्वाही आदित्य ठाकरे यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com