

Dada Empowers Sports Sector with Big Rewards and Recognition
Sakal
मुंबई: शरद पवार यांच्या पावलावर पाऊल टाकून अजित पवार यांनी राज्याच्या क्रीडा क्षेत्रासाठीही मोठे कार्य केले. कबड्डीपासून खो खो संघटनांसह राज्य ऑलिंपिक संघटनेचेही अध्यक्षपद त्यांनी भुषवलेले आहे. क्रिकेटमध्ये मोठे यश मिळाले की खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव होत असतो. असाच सन्मान मातीतील खेळात भव्य यश मिळवणाऱ्या आपल्या खेळाडूंनाही मिळावा, यासाठी अजित पवार यांनी पुढाकार घेतला आणि २०१२ मध्ये झालेल्या महिला कबड्डी विश्वकरंडक स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघातील महाराष्ट्राच्या सुवर्णा बारटक्के, अभिलाषा म्हात्रे आणि दीपिका जोसेफ यांना प्रत्येकी एक कोटी रुपये दिले होते. त्यानंतर नेमबाज राही सरनोबत हिचाही एक कोटी देऊन सन्मान केला होता. त्यावेळीही उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांनी विश्वकरंडक, आशिया आणि ऑलिंपिक स्पर्धेत यश मिळवणाऱ्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना एक कोटी रुपये देऊन सन्मान करण्याचा नियमच केला होता. सध्या राज्याच्या क्रीडा मंत्रालयाचीही जबाबदारी अजित पवार सांभाळत होते.