डहाणू - नौका दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या पालकांना मुख्यमंत्री निधीतून आर्थिक मदत मिळावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्य सरकारकडे पाठवला आहे.
येथील पारनाक्याजवळील समुद्रात शनिवारी (ता. 13) नौका उलटल्याने जान्हवी सुरती (17), सोनाली सुरती (17), संस्कृती मायावंशी (17) या विद्यार्थिनींचा बुडून मृत्यू झाला; तर 32 जण बचावले. मृत विद्यार्थिनींच्या पालकांना मुख्यमंत्री निधीतून आर्थिक मदत मिळावी याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आल्याची माहिती पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सोमवारी दिली.
नौकामालकांना कोठडी
दुर्घटनाग्रस्त नौकेचे मालक महेंद्र अंभिरे, पार्थ अंभिरे, धीरज अंभिरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पार्थ आणि धीरज यांना शुक्रवारपर्यंत (ता. 19) पोलिस कोठडी दिली आहे. महेंद्र याच्यावर डहाणू कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, त्याला अटक करण्यात आलेली नाही. पोलिस उपनिरीक्षक राहुल कांबळे दुर्घटनेचा तपास करीत आहेत.
|