डहाणू - देशातील डॉक्टर, वकील, व्यवसायिक नाराज आहेत. शेतकरी संपावर गेला आहे. या परिस्थितीत सरकार निश्चित कसे, असा प्रश्न उपस्थित करत निवडणुका जिंकून सत्ता गाजवता येत नाही, अशी जोरदार टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी आज संवाद दौऱ्यावेळी केली.
महाराष्ट्र हेल्थ मिशन आणि महाराष्ट्र न्युट्रीशन मिशनद्वारे कुपोषणमुक्तीसाठी काम केले जात होते. भाजप सरकारने या योजना बंद केल्या आहेत. त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे. कुपोषण हा विषय दोन वर्षांपासून सरकारच्या कार्यक्रम पत्रिकेवर नाही, अशी टीका सुळे यांनी केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत त्यामुळे सरकारविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरावे, असे आवाहनही त्यांनी केले.
विरोधक म्हणून आंदोलन करू नका, तर सामान्य व्यक्ती म्हणून नेतृत्व करा, असे त्या म्हणाल्या.
|