दसरा सण मोठा; पण बाजारात आनंदाला तोटा!

Vehicle-and-Gold
Vehicle-and-Gold

मुंबई/ठाणे - इंधन दरवाढ, रुपयाचे अवमूल्यन, जागतिक बाजारातील अनिश्‍चिततेने दसरा खरेदीवर मुंबई आणि ठाण्यात महागाईचे सावट दिसले. सोने ३२ हजारांवर गेल्याने सराफा बाजारातील तेजी निस्तेज झाली. पेट्रोल-डिझेलची उच्चांकी झेप आणि विमा महागल्याने ग्राहकांनी वाहन खरेदीकडे सपशेल पाठ फिरवल्याने विक्रेत्यांचा भ्रमनिरास झाला. महिन्याच्या मध्यानंतर दसरा आल्याने नोकरदारांच्या हाती तुटपुंजी रक्कम उरल्याने खरेदीवर परिणाम झाल्याचे बोलले जाते.    

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्यानिमित्त सोने खरेदी केली जाते; मात्र सवलती देऊनही गतवर्षीच्या तुलनेत यंदा ग्राहकांमध्ये निरुत्साह दिसला. सराफा बाजारात सोने प्रति १० ग्रॅमला ३१,७०० ते ३२ हजारांपर्यंत होते. सराफ व्यावसायिक धनत्रयोदशीला मोठ्या विक्रीची अपेक्षा ठेवतात; मात्र त्याची सुरुवात दसऱ्यापासून होते. त्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्ताला ग्राहक दागिन्यांच्या बुकिंगसाठी येतात. त्यातून फारशी विक्री होत नाही, असे जेम्स ॲण्ड ज्वेलरी कौन्सिलचे संचालक जे. व्ही. श्रीधर यांनी सांगितले. यंदा सोने विक्रीत ५ ते १० टक्‍के जेमतेम वाढ होईल, असे ते म्हणाले.  दादरमधील वामन हरी पेठे, चिंतामणी, जग्गनाथ पेडणेकर ज्वेलर्स यांसारख्या मराठमोळ्या सराफी पेढ्यांवर सायंकाळी ग्राहकांची गर्दी दिसली. 

दरवर्षी गणेशोत्सव, गुढीपाडव्यापेक्षा दसऱ्याला चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. यंदा विक्री ५० टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. दरवर्षी आम्ही २०० मोटारी विकतो; मात्र यंदा केवळ ६० मोटारी विकल्या गेल्या, अशी माहिती ठाण्यातील नवनीत मोटर्सचे व्यवस्थापक अफझल वाझू यांनी सांगितले.

मंदीची चाहूल
शेअर बाजारातील उलथापालथ, अमेरिका-चीन व्यापार युद्ध, खनिज तेलातील महागाई, रुपयातील अवमूल्यन यामुळे सोने-चांदीच्या दरांमध्ये दररोज बदल होत आहे. या पार्श्‍वभूमीवर बहुतांश ग्राहकांनी धनत्रयोदशीपर्यंत थांबणे पसंत केल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. पेट्रोलने नव्वदी ओलांडली असून नव्या नियमांमुळे विम्यासाठी ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. 

आमच्या मुंबई-ठाण्यातील शोरूममधून दरवर्षी किमान एक हजार दुचाकी विकल्या जात होत्या; मात्र यंदा सायंकाळपर्यंत केवळ ५०० दुचाकी विकल्या गेल्या. ५० टक्के फरक पडला आहे.
- अश्‍विनी सावंत, साई पॉईंट, ठाणे. 

डॉलरचा दर वाढत असल्याने बाजारावर परिणाम झाला आहे. नोटबंदी झाल्यानंतर दोन वर्षांनी तरी बाजार स्थिर होईल, असे वाटले होते; मात्र तसे काहीच दिसत नाही. 
- दिलीप वैद्य, सराफ मे. पांडुरंग हरी वैद्य, गावदेवी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com