Digital Exclusive :: धीरोदात्त आणि संयमी उद्धव ठाकरे..!

Digital Exclusive :: धीरोदात्त आणि संयमी उद्धव ठाकरे..!

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेचे पक्षप्रमुख  उध्दव ठाकरे यांनी निवडणूक निकालानंतर नव्या राजकीय समीकरणाची बांधणी केली. सलग पन्नास वर्ष राजकारणात परवलीचा शब्द बनलेले शरद पवार आणि गेली पन्नास वर्ष वैचारिक विरोध असलेला गांधी घराण्यांचा काँग्रेस पक्ष यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापन केले. या सरकारचे अर्थातच महा विकास आघाडीचे दोलक कायम हेलकावे खाईल आणि ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात फार प्रभावी होणार की नाही अशा शंका-कुशंकांनी गाव खेड्यातून तज्ञ जाणकारांच्या मनात जागा घेतली. पण उद्धव ठाकरे यांनी सत्तेचा सोपान सर केल्यानंतर ज्या पद्धतीने राज्य सरकारचा कारभार हाताळला आहे ते पाहून भलेभले जाणकार आणि प्रशासक देखील अचंबित झाले आहेत. अत्यंत संयमी आणि धीरोदात्तपणे आव्हानांचा सामना करताना उद्धव ठाकरे यांची राजकीय कुशलता आणि परिपक्वता जेवढी प्रभावी असल्याचे दिसते त्याहून अधिक त्यांचा संयमी बाणा आणि अत्यंत समन्वयाने सरकार चालवण्याचा अजेंडा अधिकच उजळून निघत आहे.

महा विकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर असंख्य मार्गाने विरोधकांनी सरकारला हलवण्याचा प्रयत्न केला. जे उद्धव ठाकरे कधीही विधानसभा अथवा विधान परिषदेचे सभासद नव्हते, प्रशासनात कुठलेही पद त्यांनी घेतले नव्हते. त्यामुळे ठाकरे यांचा प्रशासकीय अनुभव कसा असेल यावरून त्यांच्या टीकाकारांच्या चांगल्याच गप्पा रंगायच्या. पण मुख्यमंत्रीपदावर बसल्यानंतर महाविकास आघाडीतील तीनही पक्षाच्या नेत्यांना अत्यंत समन्वयाने आणि आघाडी धर्माच्या आदराने ठाकरे यांनी आपलेसे केले. त्यातूनच राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस पक्षाचे नेते असो जे कधीही उद्धव ठाकरे यांच्याशी जवळीक साधण्याच्या प्रक्रियेपासून कोसो दूर होते ते देखील ठाकरे यांच्या प्रेमात पडले. सरळ आणि साधा माणूस.. शब्दाचा पक्का राजकारणी.. अशी प्रतिमा ठाकरे यांनी सुरुवातीच्या काळातच बिंबवली. कोणताही बडेजाव नाही. अतिरेकी शब्दांचा प्रयोग नाही. विरोधकांवर आक्रस्ताळेपणाने टीका करणं नाही. पण राजकीय  शालजोड्या मारत अत्यंत मुरब्बी पणाने विरोधकांना नामोहरम करणं हे कौशल्य उद्धव यांच्यात असल्याचे सुरुवातीलाच दिसले.

खरंतर संकटाच्या खाईतून महा विकास आघाडीचे सरकार बनले आणि लगेचच कोरोना सारखे महाभयंकर संकट या सरकारच्या उंबरठ्यावर आले. राज्यातील जनतेची सुरक्षा आणि आरोग्या बाबतचे मोठे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर उभे राहिले. अशा प्रसंगाला ठाकरे कसे तोंड देतील ? यावरून पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्या. पण देशात कोणत्याही राज्याने कोरोनाची साथ जितक्या गंभीरतेने घेतली नाही त्यापेक्षा अधिक गंभीरतेने आणि तत्परतेने या साथीची काळजी ठाकरे यांनी ओळखली.  दहा मार्च पासूनच यावर प्रशासकीय काम त्यांनी सुरू केले. एका बाजूला तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीचा समन्वय साधणे आणि दुसऱ्या बाजूला कोरोना सारख्या साथीचा सामना करणे हे एक मोठा संघर्ष करावे असे आव्हान होते. सुरुवातीलाच ठाकरे यांनी कोरोना च्या साथीबाबत अत्यंत सावधगिरीने आरोग्य विभागाकडून माहिती जमा करायला सुरुवात केली. आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना विश्वासात घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशना बाबत तात्काळ निर्णय घ्यावा लागेल अशी सूचना ठाकरे यांनी केली.
त्याच वेळी ठाकरे यांच्यातील प्रशासक दूरदृष्टीने काम करणारा असल्याची चुणूक दिसली.

जगभरात फोफावणाऱ्या या साथीला महाराष्ट्रात आणि त्यातल्या  त्यात देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पाय पसरू देऊ नयेत यासाठी ठाकरे यांनी मेहनत सुरू केली. जबाबदाऱ्यांचे वाटप केले. आरोग्य विभागाच्या प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपवून महाराष्ट्राला आणि विशेषता 24 तास रोडावर चालणाऱ्या मुंबईला लॉकडाऊन करणे हे एक कठीण काम ठाकरे यांना करायचे होते. त्यासाठी 13 मार्च पासून त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला याबाबत सावधगिरी आणि सुरक्षितता यांचा विश्वास देण्यातच सुरुवात केली. कोणताही प्रशासकीय अनुभव पाठीशी नसतानाही ठाकरे यांनी कोरोना सारख्या आजाराचा धीरोदात्तपणे सामना करण्याची रणनीती आखली आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे आरोग्य विभागाची सर्वस्वी जबाबदारी सोपवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रशासकीय अंमलबजावणीचे अधिकार ठाकरे यांनी दिले. त्याच वेळी केंद्र सरकार सोबत बोलणं असेल, चर्चा करणे असेल आणि राज्यातील जनतेला आधार देतानाच सुरक्षिततेची काळजी याबाबतची हमी देणे यावर ठाकरे यांनी स्वतःकडे जबाबदारी घेतली. त्यातूनच राज्यसरकारच्या समन्वयाची एक उत्तम बांधणी ठाकरे यांनी 16 मार्च च्या अगोदरच केली. विधिमंडळाचे अधिवेशन 16 मार्चला संपवण्यात आले आणि महाराष्ट्रातील प्रमुख गर्दीची ठिकाणे अर्थात मॉल्स, जिम, तरण तलाव, चित्रपटगृहे नाट्यगृहे यावर पूर्णता बंदी घालण्यात आली. अत्यंत सावधगिरीने हा निर्णय घेताना कुठल्याही प्रकारचा गदारोळ होणार नाही ही याची काळजी ही ठाकरे यांनी घेतली. दररोज सकाळी आरोग्यमंत्री कोरोना बाबत राज्यातील जनतेला संबोधन करत असतानाच सायंकाळी उद्धव ठाकरे सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेला विश्वास आणि दिलासा देत होते.
 हातावर पोट असणाऱ्या कामगार आणि गोरगरीब मजुरांसाठी शिवभोजन थाळीची संख्या वाढवणे हा पहिला क्रांतिकारक निर्णय ठाकरे सरकारने घेतला आणि राज्यभरात शिव भोजनाची व्यवस्था सुरू करण्यात आली.

31 मार्चपर्यंत महाराष्ट्रातील शाळा महाविद्यालय आणि इतर सार्वजनिक ठिकाणे बंद करण्याचा ठाकरे सरकारने घेतलेला निर्णय हा कोलोनाची साखळी तोडण्यासाठी बऱ्याच अंशी महत्त्वपूर्ण ठरला. त्याशिवाय परदेशातून येणाऱ्या भारतीयांना विलगीकरण करणे त्यांची तपासणी करणे याबाबत सरकारने ठोस उपाययोजना केल्या. महाराष्ट्रात सापडलेले पहिले रुग्ण दुबई आणि अमेरिकेतून आले होते. पण दुबई आणि अमेरिका हे दोन देश केंद्र सरकारच्या धोरणात तपासणी च्या यादीमध्ये नव्हते. ठाकरे यांनी तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पत्रव्यवहार करून या दोन देशातील प्रवाशांसाठी देखील कोरोनाची चाचणी आणि विलगीकरण बंधनकारक करण्यात यावे अशी सूचना केली. महाराष्ट्रात विशेषता मुंबई विमानतळावर जगभरातील सर्वाधिक विमाने येत असल्याने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचा धोका महानगरी मुंबईला मोठा होता. पण ठाकरे सरकारच्या या तातडीच्या निर्णयाने त्यावर बऱ्याच अंशी अंकुश ठेवता आला. 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचे देशभरासाठी लॉक डाऊन घोषित केले पण त्या अगोदरच महाराष्ट्र जवळपास 70 टक्के थांबलेला होता. त्याचा परिणाम विषाणूची लागण होऊ नये आणि सोशल डिस्टन्सिंग कायम राहावे यावर झाला होता. महानगरी मुंबईत प्रचंड मोठ्या संख्येने असणारी लोकसंख्या आणि सोशल डिस्टसिंगचे सगळे नियम धाब्यावर बसवणारी परिस्थिती असून देखील ठाकरे सरकारच्या तत्परतेने त्यावर नियंत्रण मिळवणे सोपे झाले.

मागील 21 ते 22 दिवस राज्य सरकारच्या या अथक परिश्रमातून कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत असले तरी हा विषाणू तिसऱ्या टप्प्यात पोहोचणार नाही याची काळजी सरकारने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. सामाजिक लागण रोखण्या मागे ठाकरे सरकारने उचललेली पावले आज कारणीभूत ठरताना दिसत आहेत. दरम्यानच्या काळात मजूर असतील कामगार असतील बांधकाम मजूर असतील यांना विश्वासाने घरात बसणे आणि राज्य सरकार देत असलेल्या सेवां वरती समाधान मानून कोरोनाशी संघर्ष करणे या लढाईत उद्धव ठाकरे यांच्या शब्दामुळे जनतेचा सहभाग मिळाल्याचे नाकारता येत नाही. मुंबईत धारावी सारख्या झोपडपट्टी मध्ये आणि वरळी सारख्या गजबजलेल्या विभागात करुणा चा शिरकाव हे सर्वात मोठे आव्हान ठरले. पण प्रत्येक रुग्णाला तातडीने घरात जाऊन तपासणी करणे आणि त्याला विलगीकरण कक्षा पर्यंत आणणे व उपचार करणे यामध्ये राज्य सरकार यशस्वी झाले असे म्हणावे लागेल.

दहा बाय दहाच्या घरात राहणारी अनेक शेकडो कुटुंब कोरोनाच्या लागणीपासून दूर ठेवणे हे एक शिवधनुष्य होते. पण मुंबईच्या सामाजिक भौगोलिक आणि मानसिक बाबींचा अत्यंत बारकाईने अभ्यास असलेल्या उद्धव ठाकरे यांनी हे शिवधनुष्य केवळ अनुभवाच्या जोरावर पेलल्याचे नाकारता येत नाही. मुंबई शहर आणि उपनगरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र असले तरी ज्या पद्धतीने हा विषाणू फैलावतो त्या पद्धतीने महाराष्ट्रात आणि मुंबईत तो फैलावत नाही हे मान्य करावे लागेल. हे रोखण्या मागे राज्य सरकारमधील पोलिस, आरोग्य, अर्थ आणि इतर विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो समन्वय दिसतो तो समन्वय निश्चितच वाखाणण्याजोगा आहे.
 देशभरात मुंबईला कोरोना पासून वाचवणे हे एक मोठे आव्हान असल्याचे सांगितले जाते. पण मुंबई महानगरपालिका असो किंवा उद्धव ठाकरे सरकारचे प्रशासन असो त्यांनी हे आव्हान आतापर्यंत तरी पेलले आहे हे  मान्यच करावे लागेल.

या सर्व परिस्थितीत उद्धव ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वातील एक उत्तम प्रशासक आणि संकटाच्या काळी धीरोदात्तपणे उभा राहणारा नेता म्हणून राज्यभरातून त्यांचे कौतुक होत आहे. प्रशासकीय पातळीवर तर अनेक अधिकारी हे उद्धव ठाकरे यांच्या संयमी आणि शांत व्यक्तिमत्वाचे गुणगान गाताना दिसतात. कुठल्याही प्रकारचा अहंकार नाही. आक्रस्ताळी पणाचे निर्णय नाहीत. मोठाल्या जाहिरात बाजी नाही. आणि एक हाती किंवा स्वतः पुरतेच प्रशासन चालवत राज्याचे नेतृत्व करण्याची  मानसिकता नाही. हे ठाकरे यांनी या संकटाच्या काळात दाखवून दिले. त्यातूनच कोरोना सारख्या आजाराने जगातील महासत्ता तडफडत असतानाही महाराष्ट्र आणि मुंबई आजही समाधानकारकपणे सामना करत आहे. दरम्यान शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. मजुरांना अर्धपोटी झोपावे लागणार नाही.  कोरोनाच्या साथीत काम करणाऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या असुरक्षिततेची भावना होणार नाही.  याबाबत देखील ठाकरे सरकारने अत्यंत मानवतेच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतले.

सध्या महाराष्ट्रात कोरोनाची संख्या तीन हजाराच्या टप्यात असतानाही त्यांचे स्वतंत्रपणे तीन प्रकारात विलगीकरण करणे आणि त्यावरती उपचार करणे व हा विषाणू फैलावण्या पासून च्या  रोखणे हे प्राधान्य क्रमाचे काम ठाकरे सरकारने सुरू केले आहे. त्यामुळे तीन मेपर्यंत महाराष्ट्रातील कोरोना हा अत्यंत चांगल्या पद्धतीने रोखण्यात ठाकरे सरकारला आणि प्रशासनाला येईल असा विश्वास सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

detail report on how maharashtra chief minister uddhav thackeray is handling corona crisis

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com