मुंबई : एका पराभवाने खचू नका : पवार

मुंबई : एका पराभवाने खचू नका : पवार

मुंबई : "आपण मित्रपक्ष कॉंग्रेसबरोबर लोकसभा निवडणुकीत मेहनत घेतली. आपणाला यशाची खात्री होती; मात्र लोकसभेचे निकाल अपेक्षेपेक्षा खूप वेगळे लागले. जय-पराजय होत असतात. एका पराभवाने खचून जाऊ नका. आगामी विधानसभेला जोमाने सामोरे जाऊया,' अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी येथे कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या बैठकीत आत्मविश्‍वास जागवला.

मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पक्षाची आढावा बैठक झाली. या वेळी बोलताना पवार म्हणाले, की लोकसभेला आपण चांगली मेहनत घेतली होती. वातावरणही अनुकूल होते. त्यामुळे चांगल्या निकालाची अपेक्षा होती; मात्र हे निकाल खूप वेगळे लागले. यामुळे नाराज होण्याचे कारण नाही. काही दिवसांवर विधानसभेची निवडणूक आली आहे. या शंभर दिवसांत पुन्हा आपण सारे एकदिलाने आपल्या मित्रपक्षांसह जनतेत जाऊया, जनतेच्या प्रश्‍नांशी एकरूप होऊया; आपणास यश नक्‍कीच मिळेल. 

कॉंग्रेसबरोबर लवकरच जागावाटपाची चर्चा होईल. त्यामुळे जागावाटपाबाबत चिंता करण्याचे कारण नाही, असे सांगून पवार म्हणाले, की राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा कॉंग्रेस पक्षात विलीन करण्याचा मुद्दाच गैरलागू आहे. आपल्यात आणि आपला मित्रपक्ष यांच्यात फूट पाडण्यासाठी कुणीतरी खोडसाळपणे ही बातमी पसरवली आहे. तुम्ही एकदिलाने कामास लागा. 
या वेळी नूतन खासदारांचा सत्कार करण्यात आला. पक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांनी या वेळी लोकसभा निवडणुकीतील कामगिरीविषयी माहिती दिली.

विरोधकांच्या विजयाची; तसेच कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पराभवाची कारणेही या वेळी जिल्हाध्यक्षांकडून विशद करण्यात आली. काही ठिकाणी वंचित आघाडीमुळे; तर काही ठिकाणी मनापासून काम न झाल्याने आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाल्याचे सांगण्यात आले. "वंचित'मुळे तोटा झाला अशी चर्चा झाली; मात्र मनसेला सहभागी करून घेण्याबाबत चर्चा झाली नाही, असे समजते. 

या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, की विधानसभा निवडणुकीला आम्ही जोमाने सामोरे जाणार आहोत. जागावाटपाचा प्रश्‍न नाही. यावर चर्चा झाली नाही.

दोन्ही कॉंग्रेसचे कार्यकर्ते आगामी विधानसभा निवडणुकीत एकदिलाने काम करून विजय संपादन करतील. या वेळी पाटील यांनी "ईडी'ने माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना पाठवलेल्या नोटिशीबाबत भाष्य केले. ते म्हणाले, की पटेल यांच्या कामामुळे देशातील जनतेला देशात आणि देशाबाहेर इतक्‍या मोठ्या संख्येने हवाई मार्गाने प्रवास करता आला. त्यांनी केलेल्या कामाचा देशातील जनतेला लाभ झाला आहे. 

"ईव्हीएम'बाबत संभ्रम : पवार 

"ईव्हीएम'बाबत जनतेच्या मनात संभ्रम असल्याचे पवार यांनी या वेळी सांगितले. तसेच राज्यातून तसेच देशभरातून "ईव्हीएम'बाबत अनेक तक्रारी येत आहेत. काही ठिकाणी मतांची गोळाबेरीज लागत नसल्याचेही त्यांनी या वेळी कार्यकर्त्यांशी बोलताना स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com