MNS Raju Patil : तुमचा हा कोकणी स्वाभिमान का जागा झाला नाही? राजू पाटील यांनी दिले सडेतोड उत्तर

मुंबई गोवा महामार्ग दुरावस्था वरून मनसेने घेतलेली आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी जाहीर पत्रातून आपली भूमिका मांडली.
MLA Raju Patil
MLA Raju PatilSakal

डोंबिवली - मुंबई गोवा महामार्ग दुरावस्था वरून मनसेने घेतलेली आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी जाहीर पत्रातून आपली भूमिका मांडली. यात मनसेच्या खळखट्याक भूमिकेवर आपल्या राज्याच्या मालमत्तेचे तोडफोड करून नुकसान करतो...? तो कसा काय महाराष्ट्र सैनिक...? असे म्हटले आहे. याला आता मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

पाटील यांनी ट्विट करत गेली अनेक वर्ष सत्तेत भागीदार असताना किंवा सत्ताधीश असताना तुमचा हा कोकणी स्वाभिमान का जागा झाला नाही? असा सवाल करत, जर तुम्ही स्वबुद्धीने राज्याचे हित जपलेत तर आमच्यावर दगड भिरकावण्याची ही वेळच आली नसती अशी चपराक मारली आहे.

मुंबई गोवा महामार्ग दुरावस्था वरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज यांच्या इशाऱ्या नंतर मनसैनिकांनी अनेक भागांमध्ये खळखट्याक सुरु केले होते. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी जाहीर पत्र जनतेसमोर आपली भूमिका मांडली आहे.

या पत्रातून त्यांनी येत्या काही महिन्यांमध्ये मुंबई-गोवा महामार्गाचे उर्वरित बांधकाम पूर्ण होईल, असे आश्वासन दिले आहे. तसेच या मुद्द्यावरुन तोडफोड करणाऱ्या मनसैनिकांनाही खडे बोल सुनावले आहेत. याला आता मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट मधून सडेतोड उत्तर दिले आहे.

आपलाच एक महाराष्ट्र सैनिक असे म्हणत राजू पाटील म्हणाले, 'येत्या गणेशोत्सवापर्यंत सिंगल लेन चे काम व ह्या वर्षा अखेरीस संपूर्ण मार्गिका पूर्ण होईल ह्या आश्वासनाने थोडा दिलासा नक्कीच मिळाला. पण हा दिलासा नसून वचन असेल आणि तुम्ही ह्या वचनपुर्तीसाठी सज्ज असालच हीच आशा आहे!

तरीही, कोकण महामार्गावर गेली कित्येक वर्ष होत असलेले अपघात आणि त्यात गेलेले बळी पाहता कोकणातल्या ‘दगडालाही’ पाझर फुटेल, पण गेली अनेक वर्ष सत्तेत भागीदार असताना किंवा सत्ताधीश असताना तुमचा हा कोकणी स्वाभिमान का जागा झाला नाही?

जर तुम्ही स्वबुद्धीने राज्याचे हित जपलेत तर आमच्यावर दगड भिरकावण्याची ही वेळच आली नसती. आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी स्वतः तुमचा आदर्श ठेवला असता, पण काय करणार तुमच्या लेखी मात्र प्रत्येक कार्यकर्ता हा नासमज असतो, हे तुमचेच विधान नाही का ? जनतेने भिरकावलेल्या दगडामागे कोणाची इच्छा नाही, तर त्यांचा उद्वेग असतो !

तुमच्या म्हणण्यानुसार जनतेला आम्ही बोळ्याने दुध पाजतो आणि तुम्ही मात्र डोळे झाकून वर्षानुवर्ष तुमच्याच मायभूमीला, आणि आपल्या चाकरमान्यांना प्रकल्प रखडवून यम सदनी धाडत आहात असे उद्गार काढल्यास तुमच्या जिव्हारी लागू नये म्हणजे झालं.

सन्माननीय राज साहेबांनी केलेले विधान अगदी तंतोतंत खरे ठरते, 'जर टोलनाके तोडफोडीची भरपाई माझ्याकडून घ्यायची असेल तर रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांची जबाबदारी केंद्र/राज्यामध्ये बसलेले सत्ताधारी घेणार का?'

तुम्ही म्हणता तुमची निष्ठा सर्वप्रथम देशाशी आहे, म्हणूनच का द्वारकेला जायचा Expressway सात वर्षात बनतो आणि गेली सतरा वर्ष रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचं काम आजतागायत पूर्ण होत नाही. झोपलेल्या तोंडावर पाणी मारून उठवायची पद्धत आहे आणि झोपेचं सोंग घेऊन जबाबदारी झटकणार्यांना महाराष्ट्रात दगड मारून उठवायची आमची पद्धत आहे.

पनवेल ते झारप ह्या मार्गाच्या कामावर स्वतः आठवेळा उतरून तुम्ही पाहणी केलीत, अहो जे तुमचं कर्तव्य आहे त्याचंच कसलं आलंय मोठेपण?

आणि जर तुम्ही पहिल्या पाहाणीत योग्य ते निर्देश दिले असते तर कदाचित तुमच्यावर आठ वेळा चकरा मारायची वेळच आली नसती. जनतेला आत्ता केलेले वायदे तरी पाळावेत हीच आशा बाळगत आहोत. कारण दगड भिर्कावणाऱ्या जनतेचा जेंव्हा कोप होतो तेंव्हा ती खडी फोडायच्याही लायकीची ठेवत नाही, इतकं लक्षात असू द्या म्हणजे झालं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com