वेदना आणि अपघाताचा सामना करत ३००० किमीचा प्रवास; प्रखर इच्छाशक्तीच्या जोरावर पार केले हजारो किलोमीटरचे अतंर..वाचून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी...

bus driver and cancer patients
bus driver and cancer patients

मुंबई:  कर्करोगाचे ६५ रुग्ण, हृदयाचा आजार असलेली सहा चिमुकली मुले, या सर्वांचे ८४ नातेवाईक आणि त्यांचा तीन रात्र आणि चार दिवसांचा मुंबई ते आसाम असा बसप्रवास. त्यात आलेली विघ्ने, प्रवासात अत्यवस्थ झालेले रुग्ण, एकदा झालेला अपघात, त्यात बसचे झालेले नुकसान… पण इच्छाशक्ती प्रबळ असली आणि सरकार व प्रशासनाची भक्कम साथ असली की सा-या संकटांवर मात करता येते, याचा एक सकारात्मक आणि प्रेरणादायी पाठ घालून देणारी ही कहाणी या कोरोनाकाळात नुकतीच घडली. 

या कहाणीची सुरुवात झाली नवी मुंबईतून. मुंबई, नवी मुंबई येथे उपचार घेण्यासाठी आसामातून नेहमीच अनेक रुग्ण येत असतात. आसाम सरकारतर्फे वाशीमध्ये चालविण्यात येत असलेल्या आसाम भवनमध्ये ते थांबतात. कोरोनाचा कहर सुरू होण्याच्या कालखंडात असेच काही रुग्ण कर्करोगाच्या उपचारासाठी येथे आले होते. खारघरच्या टाटा कर्करोग रुग्णालयातील ओपीडीमध्ये त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते. पण अचानक लॉकडाऊन जाहीर झाले आणि या रुग्णांची तसेच त्यांच्या नातेवाईकांची बिकट अवस्था झाली. 

संचारबंदीमुळे आरोग्यसेवेवर परिणाम झाला होता. त्यामुळे दोन महिन्यांनी परत या असे या रुग्णांना सांगण्यात आले. या परिस्थितीत आपापल्या गावी परत जाण्याखेरीज त्यांच्यासमोर पर्याय नव्हता. पण जाणार कसे? या रुग्णांच्या नातेवाईकांनी आसाम भवन प्रशासनाच्या मागे लकडा लावला. निवासी सहआयुक्त देवाशीष शर्मा यांनाही या रुग्णांची तगमग दिसत होती. त्यांना परत आसामला पाठविण्यात अडचणी खूप होत्या. पण त्यांनी आसामच्या आरोग्यमंत्र्यांशी संपर्क साधला. चर्चा केली आणि या रुग्णांसाठी एका विमानाची व्यवस्था केली. 

विमान कंपनीची अट एकच होती, की या सर्व १५५ रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची आधी कोव्हिड-19 चाचणी झाली पाहिजे. मग ती चाचणी करण्यात आली. त्यात नेमके तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. ते पाहून विमान कंपनीने माघार घेतली. अखेर मग त्या तीन कोरोना बाधीत रुग्णांना नवी मुंबईतच ठेवून इतरांना आसामला पाठविण्याचे ठरले. पण जाणार कसे? आसाम सरकारच्या सांगण्यावरून शर्मा यांनी त्यांना रस्तेमार्गाने नेण्याचे ठरविले. 

त्यासाठी खास सहा आरामगाड्या ठरविण्यात आल्या. प्रवासाचे अगदी बारकाईने नियोजन करण्यात आले. प्रवास धोक्याचा होता. बसमध्ये रुग्ण असणार होते. त्यांच्याबरोबर डॉक्टर असणे आवश्यक होते. तेव्हा मग गोहाटी वैद्यकीय महाविद्यालयातील शल्यचिकित्सक डॉ. नीलाक्षी चौधरी यांना विचारणा करण्यात आली. त्यांनीही वेळ न दवडता होकार दिला. रुग्णांच्या आवश्यकतेनुसार औषधे, इंजेक्शन, ऑक्सिजन सिलींडर आदी साहित्य गोळा केले. प्रत्येक बससाठी प्रत्येकी दोन चालक नेमण्यात आले. आणि मग ९ मे रोजी सकाळी १२ वाजता हा दोन हजार ७३२ किलोमीटरचा प्रवास सुरू झाला. 

त्यात पहिली अडचण आली १० मे रोजी. दुपारी १२ वाजताच्या सुमारास या गाड्या इंदूरला पोहोचल्या. रुग्ण तहान-भुकेने कासावीस झालेले. पण इंदूरमध्ये सारेच बंद. अशा वेळी दीपशिखा संस्थेच्या निता दोशी मदतीला धावल्या. त्यांनी जैन मंदिर आणि रोटरी क्लब ऑफ मुंबईच्या साह्याने इंदूरमधील सामाजिक संस्थांची मदत मिळविली. रुग्णांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली.  पुढचा प्रवासही सोपा नव्हता. शर्मा सांगतात - प्रवासात काही रुग्णांची प्रकृती बिघडली. काहींना अपचनाचा त्रास झाला. काहींना प्रचंड थकवा आला. हाडांचा कर्करोग असलेला एक रुग्ण तर खालीच कोसळला. पण डॉ. नीलाक्षी यांनी वेळीच उपचार करून त्याला बरे केले. 

पण संकटांची मालिका संपलेली नव्हती. बिहारच्या सीमेवर असताना रात्रीच्या वेळी त्या रुग्णांच्या दोन बसेसची धडक झाली. एका बसच्या चालकासमोरील काच चक्काचूर झाली. अशा परिस्थितीत, रात्रीच्या थंडीत ती बस कशी चालवणार? अखेर रस्त्यावरून जाणा-या एका मोटारसायकल स्वारास विनंती करून त्याच्याकडील हेल्मेट घेण्यात आले. चालकाने ते चढवले.अंगात दोन स्वेटर्स चालकाने ते चढवले. अंगात दोन स्वेटर्स घातली आणि बिनकाचेची ती गाडी उत्तर प्रदेश ते बिहार अशी नेण्यात आली. 

अशा प्रकारे तीन रात्री आणि चार दिवसांचा प्रवास करून ते आसाममध्ये पोचले. तेथे एका स्टेडियमध्ये रुग्णांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तेथे पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात सात जण पॉझिटीव्ह निघाले. त्यांची एका पंचतारांकित हॉटेलात व्यवस्था करण्यात आली आणि इतरांना त्यांच्या-त्यांच्या गावी पोहचविण्यात आले. या सगळ्या प्रवासात त्यांच्यासमवेत होते देवाशीष शर्मा. ते आता परतीच्या प्रवासात आहेत. ते सांगतात, या सगळ्या प्रवासाचा तब्बल ६४ लाखांचा खर्च आसाम सरकारने उचलला. मात्र  या शरीराने खचलेल्या रुग्णांनी हा प्रवास पूर्ण केला तो केवळ प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर. त्यांच्या या जिद्दीला सलाम. 

driver drives travels 3000 kilometers even after accident read full story 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com