मुंबई - अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली महाविद्यालयांची नोंदणी करण्याचे आदेश शिक्षण विभागाने अद्याप दिलेले नाहीत. यामुळे यंदाही अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून केवळ प्रशिक्षणाचा फार्स सुरू असल्याची चर्चा अधिकाऱ्यांमध्ये आहे.
अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे यंदा दहावे वर्ष आहे. विविध कारणांमुळे ऑनलाईन प्रवेशांत होणारा गोंधळ टाळण्यासाठी विद्यार्थी दहावीत असतानाच शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून ऑनलाईन प्रवेशाची तयारी करून घेण्यात येते. दर वर्षी विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असतानाच कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी करून घेण्यात येते. यंदा परीक्षा होऊनही महाविद्यालयांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू झालेली नाही.
त्यामुळे शाळांचे प्रतिनिधी प्रवेश प्रक्रियेबाबत उपसंचालक कार्यालयात विचारणा करण्यासाठी जाऊ लागले आहेत. नोंदणीची प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असे अधिकारी सांगतात; मात्र नोंदणीच्या सूचना शिक्षण विभागाकडून येत नसल्यामुळे उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांची अडचण होत आहे.
|