
भावाच्या निधनानंतर वसईतील काजलने दिली दहावीची परीक्षा
विरार : वसई पूर्वेकडील राजावली या गावात जूचंद्र येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात शिकणाऱ्या काजल चव्हाण हिच्या मोठ्या भावाचे विजेच्या धक्याने निधन झाल्यानंतर अंत्यसंकरासाठी या मुलीला आपल्या गावी म्हणजेच जालना येथे जावे लागले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी दहावीचा पहिला पेपर होता. मात्र वसईत परीक्षा देण्यास येणे शक्य नसल्याने तिचे संपूर्ण वर्ष वाया जाणार होते. मात्र ती शिकत असलेल्या शाळेतील शिक्षक आणि तिच्या मामाने केलेले शर्थीचे प्रयत्न याला यश येत सदर मुलीचे दहावीचे वर्ष वाया जाण्यापासून वाचले आहे.आता पुढचे सर्व पेपर काजल जालना येथील केंद्रातून देणार आहे.
वसई पूर्वेकडील राजावली येथे राहणाऱ्या काजल सुरेश चव्हाण असे या इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीचे नाव असून ती आपले आई वडील आणि भावंडं यांच्यासह राहते. तर येथीलच कर्मवीर माध्यमिक विद्यालय जूचंद्र शाळेत ती शिकत आहे. रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास काजलच्या १८ वर्षयीय भावाचे विजेच्या तारेचा धक्का लागून निधन झाले. मूळ गाव जालना जिल्ह्यातील हिवरखेडा असल्याने त्याच्यावर अंत्यसंकर करण्यासाठी रुग्णवाहिकेच्या मदतीने त्याचा मृतदेह गावी नेण्यात आला. रात्री साडेबाराच्या सुमारास हिवरखेडा येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच सोमवार पासून दहावीची परीक्षा सुरु होणार होती. त्यामुळे काजलला सोमवारी वसईत येणे शक्य नव्हते. त्यामुळे तिचे दहावीचे संपूर्ण वर्ष वाया जाण्याची वेळ आली होती. काजलला जालना मध्येच परीक्षा केंद्रावर परीक्षा देणे शक्य होण्यासाठी तिचा मामा अमोल राठोड यांचे प्रयत्न सुरु झाले.
त्यांनी सर्वात आधी वसईतील ती शिकत असलेल्या शाळेमध्ये संपर्क साधून शिक्षकांना याची कल्पना दिली. राज्य अंतर्गत कोणत्याही केंद्रावर विद्यार्थी परीक्षा देऊ शकतो याबाबत त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी केलेल्या मागदर्शनानुसार आणि बोर्डाच्या काही अधिकारी तसेच कर्मचारी यांच्या सहकार्याने काजल ला जालना मध्येच परीक्षा देण्याची संधी मिळाली. येथील जिल्हा परिषद शाळा, मंठा या शाळेत तिने दहावीचा पहिला पेपर दिला. तसेच आता या पुढचे सर्वच पेपर तिला याच केंद्रावर द्यावे लागणार असून ती येथूनच परीक्षा देणार असल्याचे काजलने सांगितले.
दहावीच्या परीक्षा पेपरला काजळ आली नसल्याचे समजल्यावर आम्ही तिला पोरं केल्या नंतर आम्हाला समजले कि , तिच्याक भावाचे निधन झाल्याने ती गावाला गेली आहे . मग आम्ही तिच्या घरच्यांशी बोललो आणि तिला तिकडेच परीक्षा देता येईल असे सांगितले. त्यानंतर तिला घेऊन तिचा मामा जालना केंद्रावर गेला. परंतु त्या ठिकाणच्या केंद्रप्रमुखाने हे दहावीचे बोर्ड वेगळे आहे. असे सांगून तिला परीक्षा देण्यास मज्याव केला.मग आम्ही थेट मुंबई विभाग राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाचे सचिव सुभाष बोरसे यांच्या कानावर हा प्रकार घातल्यावर अखेर काजलला परीक्षा देता आली. तिचे वर्ष वाया जाताना वाचले आहे.
- जितेंद्र भोईर, पर्यवेक्षक , कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय ,जूचंद्र