गिधाडांमुळे बागायतदारांवर संक्रांत

संग्रहित
संग्रहित

महाड : महाडमधील सिस्केप संस्थेकडून रायगड जिल्ह्यातील महाड, माणगाव व श्रीवर्धन तालुक्‍यात गिधाडांचे संवर्धनाचे काम सुरू आहे. या मोहिमेमध्ये सिस्केपसोबत महत्त्वाची भूमिका बजावणारे नारळ बागायतदार गिधाडांच्या घरट्यांमुळे होणाऱ्या झाडांच्या नुकसानीने अडचणीत आले आहेत. त्यामुळे नारळ बागायतदारांना सिस्केप व अन्य संस्थांकडून मदतीचा हात पुढे होत असला तरीही सरकारने नुकसानभरपाई द्यावी, यासाठी सिस्केपने पाठपुरावा सुरू केला आहे.

निसर्गामध्ये स्वच्छतेचा समतोल राखण्याचे महत्त्वाचे काम गिधाडे करत असतात; मात्र गेल्या काही वर्षांपासून नामशेष होत असलेल्या गिधाडांचे संवर्धनाचे काम महाडच्या सिस्केप संस्थेने 15 वर्षांपासून हाती घेण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रेमसागर मेस्त्री यांनी म्हसळा तालुक्‍यातील चिरगाव, श्रीवर्धन, महाडमधील नानेमाची, माणगाव या परिसरामध्ये गिधाडांच्या संवर्धनाचे काम सुरू केले आहे. त्यामुळे या भागातील गिधाडांची संख्या 300 च्या आसपास पोहोचली आहे. 

या संवर्धनाची दखल देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात घेण्यात आली आहे. संवर्धनाचे काम करणारी सिस्केप संस्था व त्यांचे अध्यक्ष प्रेमसागर मिस्त्री याबाबत आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये मार्गदर्शनही करत आहेत. गिधाडांचे संवर्धन करण्याच्या कामांमध्ये स्थानिक ग्रामस्थांचेही मोठे योगदान आहे. श्रीवर्धन परिसरामधील नारळ बागायतदार यात सहभाग देत आहेत.

श्रीवर्धन समुद्रकिनारी असलेल्या खोताची वाडी, दातार वाडी रईस्ते यांची वाडी अशा वेगवेगळ्या भागांमध्ये नारळाच्या बागेमध्ये गिधाडांची 53 घरटी आहेत. गिधाडे नारळाच्या झाडांवर घरटी बांधतात. त्यामुळे बागायतदारांची दरवर्षी 20 ते 25 नारळाच्या झाडांचे नुकसान होते. त्यातून नारळाचे उत्पादन मिळणे अवघड होते; तरीही बागायतदार पर्यावरणामध्ये व गिधाड संवर्धनामध्ये सहभाग रहावा, या सामाजिक बांधिलकीतून नुकसान सहन करत आहेत.

बागायतदारांच्या बैठकीला नंदकुमार चितळे, अशोक माळी, अक्षय चोगले, अमन बरडे, परशुराम केळसकर, बाळा वाणी यांच्यासमवेत मोठ्या प्रमाणावर बागायतदार उपस्थित होते. जावडेकर यांनी त्यांच्या मागणीचा सरकारदरबारी पाठपुरावा केला जाईल, असे सांगितले. पर्यावरण रक्षणाचे उत्तम काम सुरू असतानाच त्यामध्ये योगदान देणाऱ्या बागायतदारांचाही सरकारी पातळीवर विचार होणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले.  

बैठकीत मांडल्या व्यथा 
सिस्केप संस्था, सह्याद्री मित्र चिपळूण व महाडची सह्याद्री गिरिभ्रमण यांच्यामार्फत एक ते दीड हजार रुपये प्रत्येक झाडामागे नुकसानभरपाई बागायतदारांना दिली जाते; परंतु ही भरपाई त्यांच्या नुकसानीच्या प्रमाणात कमी असते. त्यामुळे नुकसानभरपाई वाढवून देण्यासाठी सरकारने वनविभागाकडे तरतूद करावी, अशी नारळ बागायतदारांची मागणी आहे. यासंदर्भात 7 फेब्रुवारीला नारळ बागायतदारांनी पर्यावरणप्रेमी सुहास जावडेकर, अध्यक्ष प्रेमसागर मेस्त्री, वनक्षेत्रपाल मिलिंद राऊत व संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी बैठकीत अडचणी मांडल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com