उच्च न्यायालयाचे ताशेरे; मुंबईतून 26 हजार बेपत्ता
मुंबई - 'प्रत्येक वेळी चित्रपटात दाखवतात तशी मुलगी प्रियकरासोबत पळून गेली असावी, असा विचार पोलिसांनी करू नये. परिस्थिती वेगळी असू शकते', या शब्दांत न्यायालयाने पोलिसांच्या मानसिकतेवर नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबईत 2013 ते 2017 या पाच वर्षांत तब्बल 26 हजार मुली बेपत्ता झाल्या. त्यापैकी 24 हजार 444 मुलींचा शोध लागला असला तरी, दोन हजार 264 मुली अजूनही बेपत्ता आहेत. यापैकी पाच हजार 58 अल्पवयीन होत्या, अशी माहिती सरकारतर्फे उच्च न्यायालयात नुकतीच देण्यात आली.
गेल्या वर्षी ठाण्याहून एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली. याप्रकरणी तपासातील अपयश पाहून न्या. एस. जी. धर्माधिकारी आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. पोलिसांची मानसिकता बदला. मुलगी बेपत्ता होण्यामागे प्रियकर एवढाच धागा आहे, असे समजणे चूक आहे. प्रत्यक्ष जीवन आणि चित्रपटाचे कथानक यातील फरक अधिकाऱ्यांनी समजून घ्यावा, असे मत न्यायालयाने नोंदवले. पोलिसांच्या तपासात न्यायालयानेच हस्तक्षेप करून प्रगती अहवाल मागवावा, अशी मागणी मुलीच्या वडिलांनी याचिकेत केली आहे. हा अहवाल दोन आठवड्यांत सादर करण्याचे आदेश खंडपीठाने दिले.
|