'बकरी ईद'साठी राजस्थानातून बोकड दाखल; मात्र मागणी नसल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान...

'बकरी ईद'साठी राजस्थानातून बोकड दाखल; मात्र मागणी नसल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान...


विरार - मुस्लिम धर्मियांच्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर राजस्थान राज्यातून कुर्बानीच्या बोकडांची आवक सुरू झाली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील देवनार पशुवध गृह आणि बाजार बंद असल्याने राजस्थानच्या व्यापाऱ्यांनी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मनोर नजीकच्या हॉटेल परिसरात बोकडांचा बाजार सुरु केला आहे गेल्या .दोन दिवसांत बोकडांची विक्रीला प्रतिसाद मिळत नसल्याने हे व्यापारी हवालदिल झाले आहेत . गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी  बोकडांना अपेक्षित दर मिळण्याची शक्यता धूसर झाल्याने यंदा नुकसान होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

मुस्लिम धर्मीयांत बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी कुर्बानी देण्याची प्रथा असल्याने कुर्बानीसाठी बोकड खरेदी केले जातात. यंदा मुंबईत देवनार पशुवध गृह बंद आहे. त्यामुळे मुंबई पासून साठ  ते सत्तर किलोमीटर अंतरावरील मनोर परिसरातील हॉटेल परिसरात राजस्थानच्या व्यापाऱ्यांनी बोकड विक्रीचा बाजार सुरू केला आहे. यंदाच्या बोकड विक्रीवर कोरोनाची प्रभाव जाणवत आहे. दरवर्षी बकरी ईदच्या पंधरा दिवस आधी मुंबईत बोकड घेऊन दाखल झाल्यानंतर पाच दिवसांत सगळे बोकड विक्री करून व्यापारी बकरी ईद सण साजरा करण्यासाठी राजस्थानला परतत असत. परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बकरी ईदला आठवडा भराचा अवधी शिल्लक असताना राजस्थान मधून पाच ट्रक मधूम सुमारे चारशे बोकड मनोर परिसरात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. परंतु दोन दिवसानंतरही बोकडांच्या विक्रीला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.

राजस्थान राज्यातील हरियाणा राज्याच्या सीमेवरील अलवर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी तोतापुरी, अजमेरी, डांग,देशी,नागफणा आणि कोटा जातीचे उमदे बोकड विक्रीसाठी आणले आहेत. बकरी ईदला सर्व बोकडांची विक्री झाल्यानंतर व्यापारी मंडीतून सहा महिने ते एक वर्ष वय असलेले बोकड खरेदी करतात. या बोकडांच्या पालन पोषणासाठी चणा, दूध, गहू, हरीपत्ती आणि राईचे तेल खाऊ घातले जाते. यासाठी सहा महिन्यांसाठी सुमारे दहा हजार, तर वर्षभरात सुमारे वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च येत असल्याची माहिती इलियास खान नामक व्यापाऱ्याने दिली.

गेल्या वर्षी एक वर्ष वय  आणि साठ ते सत्तर किलो वजनाच्या बोकडांना पन्नास हजार तर दोन वर्षे वय  आणि दीडशे ते दोनशे किलो वजन असलेल्या बोकडांची एक ते सव्वा लाख रुपयांत विक्री केली होती.यंदा बाजारातील मंदी आणि कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावामुळे बोकडांना अपेक्षित किंमत मिळणार नाही. त्यामुळे भांडवली खर्चापेक्षा कमी किंमत मिळण्याची चिन्हे आहेत.बोकडांना बाजारात विक्रीसाठीचा वाहतूक खर्च ही निघेल कि नाही असे अमजद खान या व्यापाऱ्याने 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

------------------------------------------------

Edited by Tushar Sonawane

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com