मुंबई - पत्रकारांचे स्थैर्य आणि चौथ्या स्तंभाचा अंकुश कायम राहावा, यासाठी राज्य सरकार सदैव त्यांच्या पाठीशी ताकदीने उभे आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघांतर्फे सह्याद्री अतिथिगृह येथे वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी कृ. पां. सामक जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
फडणवीस म्हणाले, ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजना लवकरच कार्यान्वित करण्यात येईल. पत्रकारांच्या घराबाबत "म्हाडा'च्या माध्यमातून योजना तयार केली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत पत्रकारांना पूर्णपणे समाविष्ट केले आहे. त्यासाठी मंत्रिमंडळानेही मंजुरी दिली आहे. या योजनेत पत्रकारांच्या समावेशाबाबत व्यापक व्याख्या केल्याने, पत्रकारांच्या कुटुंबीयांनाही आरोग्य सुविधा मिळतील.
|