दर वर्षी प्रत्येक शहरात "ग्रीन पार्क' उभारणार
मुंबई - झपाट्याने शहरीकरण झाल्याने पर्यावरणाच्या समस्या भेडसावत आहेत, तर शहरवासीयांना मोकळा आणि स्वच्छ श्वास घेणे मुश्कील झाले आहे. यावर मात करण्यासाठी राज्यातील अमृत शहरांमध्ये दर वर्षी "ग्रीन पार्क' उभारली जाणार आहेत. त्यामुळे या शहरांची यापुढील काळात "फुप्फुस' सुधारणार आहेत.
केंद्र सरकारने स्मार्ट शहर उपक्रमाप्रमाणे "अमृत' हासुद्धा शहरी भागासाठी उपक्रम राबवला जात आहे. यामध्ये राज्यातील सुमारे 43 शहरांचा समावेश केला आहे. त्यामधील रहिवाशांसाठी दर वर्षी हरित क्षेत्र विकास प्रकल्पाअंतर्गत "ग्रीन पार्क' उभारली जाणार आहेत. शहरातील आरक्षित जागांवर अशी पार्क उभारली जाणार आहेत. यासाठी झाडे लावणे, उद्याने तयार करणे, ज्येष्ठ नागरिक, मुले यांच्यासाठी खास सोईसुविधा असलेले उद्याने तयार करणे यावर भर देण्यात आला आहे.
याकरिता शहरातील आरक्षित जागांवर हरित क्षेत्र विकसित करताना स्वच्छ ऑक्सिजन मिळावा हा यामागील उद्देश आहे. औद्योगिकीकरण, सिमेंट क्रॉंकीटच्या इमारती, सांडपाणी व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन आदी समस्यांमुळे शहरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे शहरांत ठिकठिकाणी हरित क्षेत्र विकसित करून यावर मात करण्याचे धोरण नगरविकास विभागाने अनुसरले आहे. यासाठी केंद्र सरकार 50 टक्के निधी, राज्य सरकारचा नगरविकास विभाग 25 टक्के, तर संबंधित शहराची स्थानिक नागरी संस्था 25 टक्के असा निधी उभारणार आहेत. दर वर्षी एक हरित प्रकल्प प्रत्येक शहरात उभारला जाणार असून, प्रत्येक प्रकल्पांसाठी एक कोटी इतका निधी खर्च केला जाणार आहे. 2015-16 मध्ये 42 तर 2016-17 या सालात 43 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे, तर काही शहरांतील प्रकल्पांच्या आढावा बैठका पार पडल्या आहेत.
अमृत शहरे
बृन्मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, औरंगाबाद, नवी मुंबई, सोलापूर, मिरा-भाईंदर, भिंवडी, अमरावती, नांदेड-वाघाळा, कोल्हापूर, उल्हासनगर, सांगली-मिरज-कुपवाड, मालेगाव, जळगाव, अकोला, लातूर, धुळे, अहमदनगर, चंद्रपूर, परभणी, इचलकरंजी, जालना, अंबरनाथ, भुसावळ-पनवेल, बदलापूर, बीड, गोंदिया, सातारा, बार्शी, यवतमाळ, अचलपूर, उस्मानाबाद, नंदुरबार, वर्धा, उदगीर, हिंगणघाट.
|